
वृक्षारोपण व संवर्धन सामाजिक जबाबदारी- जिल्हाधिकारी दिलीप स्वामी सामाजिक वनीकरण विभागाच्या वतीने वृक्ष उत्पादक आणि वृक्ष खरेदीदार मेळावा.
छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी): पर्यावरण संतुलन राखण्यासाठी वृक्षारोपण व वृक्षांची जोपासना करुन खऱ्या अर्थाने संवर्धन करणे ही प्रत्येक नागरिकांची सामाजिक जबाबदारी आहे असे प्रतिपादन जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी केले.
सामाजिक वनीकरण विभागाच्या वतीने संत एकनाथ रंगमंदीर येथे वृक्ष उत्पादक आणि वृक्ष खरेदीदार मेळाव्याप्रसंगी जिल्हाधिकारी श्री स्वामी बोलत होते. यावेळी विभागीय वन अधिकारी किर्ती जमदाडे- कोकाटे, उपवनसंरक्षक सुवर्ण माने, मानद वन्यजीवरक्षक किशोर पाठक, हिमायत बाग फळ संशोधन केंद्राचे प्रमुख डॉ. संजय पाटील उपस्थित होते.
जिल्हाधिकारी श्री स्वामी म्हणाले, सामाजिक वनीकरण विभागाच्या माध्यमातून वनसंवर्धनाबाबत चांगले काम होत आहे. वृक्ष उत्पादक आणि वृक्ष खरेदीदार मेळाव्यात वनसंवर्धनाला गती देणाऱ्या सर्व विषयांचा समावेश करण्यात आला आहे. वृक्षलागवड मोठया प्रमाणात होते मात्र लागवड केलेल्या वृक्षापैकी किती वृक्ष जिवंत राहतात, हे महत्त्वाचे आहे. सोलापूर येथे काम करताना आषाढी एकादशीला येणाऱ्या वारकरी बांधवांना विसावा मिळावा यासाठी त्यावेळी दिंडयाच्या प्रवेशापासून ते पंढरपुर पर्यंतच्या रस्त्यावर वारकरी बांधवांच्या हस्ते झाडे लावली. आज ही झाडे चांगली बहरली आहेत. वृक्षवल्ली आम्हा सोयरे, वनचरे म्हणून थांबून चालणार नाही, आजच्या नवीन पिढीमध्ये ही बाब रूजवावी लागणार आहे.
आपल्या पुढच्या पिढीसाठी चांगले पर्यावरण आहे का, याचा विचार प्रत्येकाने करण्याची गरज असल्याचे सांगून जिल्हाधिकारी स्वामी म्हणाले, छत्रपती संभाजीनगर जिल्हाधिकारी म्हणून पदभार स्विकारल्यानंतर कामाच्या निमित्ताने अनेक गावात गेलो, त्यावेळी गावात वडाचे झाडे मात्र दिसत नव्हते. एक वडाचे झाड संपूर्ण गावाला शुदध हवा देते, वनविभागासोबत बैठक घेत जिल्हयातील प्रत्येक गावात वडाच्या पाच वृक्षांची लागवड करण्याचा निर्णय घेतला. निसर्गाने आपल्याला भरभरून दिले आहे. निस्वार्थपणे मानव जातीची निसर्गाने सेवा केली आहे. श्वास टिकवायचा असेल तर निसर्ग टिकवला पाहीजे. वृक्ष संवर्धन केले पाहीजे. वृक्ष लागवडीला चालना दिली पाहीजे.i: कोरोना काळात आपल्याला हवेची किंमत समजली आहे. त्यामुळे यापुढील कालावधीत पर्यावरण रक्षणासाठी प्रत्येकाने पुढे यायला पाहीजे. आजच्या कार्यशाळेत बांबु लागवड, चंदन शेती हे महत्त्वाचे विषय घेतले आहे. बांबु लागवडीला जगात खुप महत्त्व आले आहे. दोन तीन देशात संपूर्ण विमानतळ, हॉटेल बांबुपासून बनविण्यात आले आहे. आंतरराष्टीय बाजारपेठेत बांबुची मागणी आहे. बांबु, चंदन, फळबाग याबाबतचे अर्थशास्त्र समजून घ्यायला पाहीजे. चंदन, बांबु यांना बाजारपेठेत मागणी आहे. वृक्ष लागवड करताना पूरक व्यवसाय म्हणून अनेक शेतकरी पुढे येत असल्याचा उल्लेखही जिल्हाधिकारी स्वामी यांनी केला.
वृक्ष लागवडीच्या बाबतीतही शेतकऱ्यांनी एकत्रित यायला पाहीजे, याबाबतच्या बाजारपेठेबाबतही शेतकऱ्यांमध्ये चर्चा व्हायला पाहीजे. वृक्षारोपन कार्यक्रमापुरते नाही तर सातत्याने यामध्ये प्रत्येकाने सहभाग घ्यायला हवा. नवीन पिढीचा यातील सहभाग अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. वृक्ष लागवड व खरेदीदार यांची एकत्रित साखळी तयार होत असताना यामध्ये प्रक्रिया, बाजारपेठ, अर्थशास्त्रज्ञ यांचा सहभाग महत्त्वाचा ठरेल, असेही जिल्हाधिकारी स्वामी म्हणाले.
विभागीय वन अधिकारी किर्ती जमदाडे- कोकाटे यांनी प्रास्ताविक केले. छत्रपती संभाजीनगर,जालना, परभणी व हिंगोली या चार जिल्हयांतील वृक्ष उत्पादक आणि वृक्ष खरेदीदार यांचा आजचा मेळावा त्यातील लाभार्थी शेतकऱ्यांचे अनुभव इतरांना प्रेरणा देणारे ठरतील. आपण सर्व मिळून राज्याला हरित करण्यासाठी योगदान देवूया, असे आवाहनही त्यांनी केले.
यावेळी उपवनसंरक्षक सुवर्ण माने यांनी वातावरणीय बदलाबाबत माहिती दिली.यावेळी छत्रपती संभाजीनगर,जालना, परभणी व हिंगोली या चार जिल्हयांतील वृक्ष उत्पादक आणि वृक्ष खरेदीदार उपस्थित होते.
******



