नागरिकांनी प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेत नोंदणी करावी- जिल्हाधिकारी आशिमा मित्तल· जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांच्या हस्ते योजनेअंतर्गत 2 लाख रुपयांच्या धनादेशाचे वितरण· अटल पेंशन योजनेअंतर्गत सर्वोकृष्ट जिल्हा पुरस्कार
जालना प्रतिनिधी :- राष्ट्रीयकृत बँकेत खाते असणाऱ्या जिल्ह्यातील नागरिकांना नियमितपणे केवळ 436 रुपये वार्षिक हप्ता भरुन प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेचा लाभ घेता येतो. या योजनेसाठी उत्पन्नाची कोणतीही अट नाही. शेतकरी, व्यावसायिक, कामगार, नोकरदार आदि या योजनेत सहभागी होवू शकतात. तरी जिल्ह्यातील 18 ते 50 वयोगटातील बँकेत खाते असणाऱ्या नागरिकांनी प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेत नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी केले आहे.
जिल्हाधिकारी यांच्या कक्षात गुरुवार दि.21 ऑगस्ट 2025 रोजी सायंकाळी 4 वाजता प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेच्या लाभार्थ्यांस धनादेशाचे वितरण करण्यात आले. यावेळी छत्रपती संभाजीनगर येथील बँक ऑफ महाराष्ट्रचे उपप्रादेशिक अधिकारी मुकूंद कांबळे, जिल्हा अग्रणी बँक अधिकारी मंगेश केदार, व्यवस्थापक हितेश दामोर, आकाश पाटी, कैलास तावडे यांची उपस्थिती होती.
यावेळी जिल्ह्यातील प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेसाठी बँक ऑफ महाराष्ट्रच्या कुंभार पिंपळगाव येथील शाखेतील खातेदार असलेले स्व. संतोष कंतुले यांच्या वारसदार श्रीमती रत्नमाला संतोष कंतुले यांना जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांच्या हस्ते 2 लाख रुपयांचा धनादेशाचे वितरण करण्यात आले. यावेळी संबंधित यंत्रणेचे अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.
राष्ट्रीयकृत बँकेत खाते असणाऱ्या तसेच प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेचा वार्षिक हप्ता केवळ 436 रुपये भरलेल्या खातेधारकाचा कोणत्याही कारणामुळे मृत्यू झाल्यास त्यांच्या वारसदारास 2 लाख रुपयांची रक्कम शासनाकडून प्रदान करण्यात येत असते. जिल्ह्यात प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेतंतर्गत पात्र बचत खातेधारकांची संख्या 13 लाख 67 हजार अशी आहे. जालना जिल्ह्यात प्रधानमंत्री जनधन योजना खातेधारक पात्र संख्या 4 लाख 70 हजार लाख अशी असून आजअखेर प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेतंर्गत 224 लाभार्थ्यांना प्रत्येकी 2 लाख रुपयांप्रमाणे दावे वितरित करण्यात आले आहेत. तर प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेतंर्गत 64 लाभार्थ्यांना दावा रक्कम वितरीत करण्यात आली आहे.
तसेच, प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेत वार्षिक फक्त 20 रुपये वार्षिक हप्ता भरून अपघाती मृत्यू अथवा अपंगत्वाच्या प्रकरणात 1 ते 2 लाख रुपयांचे विमा संरक्षण मिळते. अशी माहिती यावेळी देण्यात आली. तसेच अटल पेंशन योजनेअंतर्गत सर्वोकृष्ट जिल्हा पुरस्कार जालना जिल्ह्याला मिळाला आहे. त्याचे प्रमाणपत्रही जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांच्या हस्ते संबंधित यंत्रणेच्या अधिकाऱ्यांना यावेळी प्रदान करण्यात आले.