
उपसा सिंचन योजनेतून दुष्काळी भागाचे नंदनवन – जलसंपदा मंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील म्हैसाळ जत विस्तारित उपसा सिंचन योजनेच्या बोगदा कामाचा ब्रेकथ्रू .प्रकल्पातील दोन लाईनचे काम पूर्ण- दुष्काळी जत तालुक्यासाठी जीवनदायी
सांगली, प्रतिनिधी.: म्हैसाळ जत विस्तारीत उपसा सिंचन योजनेमुळे दुष्काळी भागातील शेवटच्या टोकापर्यंत पाणी पोहोचणार असून शेतकऱ्यांचे जीवन सुखकर होणार आहे. या प्रकल्पाच्या दोन लाईनचे काम पूर्ण झाले आहे आणि तिसऱ्या लाईनसाठी सकारात्मक प्रयत्न करण्यात येतील. उपसा सिंचन योजनांच्या माध्यमातून दुष्काळी भागाचे नंदनवन झाल्याशिवाय राहणार नाही, असे प्रतिपादन राज्याचे जलसंपदा (गोदावरी व कृष्णा खोरे विकास महामंडळ) मंत्री डॉ. राधाकृष्ण विखे-पाटील यांनी आज केले.
मिरज तालुक्यातील बेळंकी येथे म्हैसाळ जत विस्तारित उपसा सिंचन योजनेच्या बोगदा कामाचा ब्रेकथ्रू कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. यावेळी खासदार विशाल पाटील, आमदार सदाशिव खोत, आमदार इद्रिस नायकवडी, आमदार गोपीचंद पडळकर, महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक ह. तु. धुमाळ, जिल्हाधिकारी अशोक काकडे, सांगली पाटबंधारे मंडळाचे अधीक्षक अभियंता चंद्रशेखर पाटोळे, माजी आमदार पृथ्वीराज देशमुख, आमदार डॉ. सुरेश खाडे यांच्या सुविद्य पत्नी सुमन खाडे, स्वाती खाडे, जिल्हा परिषदेचे माजी सभापती ब्रम्हानंद पडळकर आदि मान्यवर उपस्थित होते.
बोगदा कामाचा अंतिम टप्पा पूर्ण झाल्याची घोषणा करून मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दुष्काळी भागाला पाणी देण्याचे काम अत्यंत प्रभावीपणे हाताळले आहे. शासनाने दुष्काळमुक्त महाराष्ट्र करण्याचे स्वप्न पाहिले आहे. कृष्णा खोऱ्यातील कामांना वेग मिळाला असून, अनेक पिढ्यांचे स्वप्न आता पूर्ण होताना दिसत आहे. टेंभू आणि म्हैसाळ सारख्या उपसा सिंचन योजनांमुळे दुष्काळी भागात नंदनवन फुलत आहे. ही योजना जत तालुक्याच्या दुष्काळी भागासाठी जीवनदायी ठरणार असून सिंचनक्षेत्रात मोठी वाढ होईल. या योजनेमुळे जत तालुक्यातील शेतीस मोठा दिलासा मिळणार असून, शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होईल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. या प्रकल्पासाठी आमदार गोपीचंद पडळकर यांनी सातत्याने पाठपुरावा केला आणि मेहनत घेतल्याचे ते म्हणाले.
प्रकल्पाची कामे गुणवत्तापूर्ण होतील याकडे लक्ष द्यावे, असे सांगून जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील म्हणाले, शेतकऱ्यांच्या शेतामध्ये पाणी गेले पाहिजे, ही शासनाची भूमिका असून यासाठी निधी कमी पडणार नाही. कालवे स्वच्छ ठेवणे आणि त्यांची पाणी वाहून नेण्याची क्षमता पूर्णपणे वापरली जाईल याची काळजी घेण्याचे आदेश त्यांनी यावेळी अधिकाऱ्यांना दिले, जेणेकरून शेवटच्या टोकापर्यंत पाणी पोहोचेल. या भागात उपसा सिंचन योजनेच्या माध्यमातून पाणी उपलब्ध झाल्यामुळे आता द्राक्ष, डाळिंब आणि उसाच्या क्षेत्रात मोठी वाढ झाली असून लोकांचे जीवनमान सुधारत आहे. आज या ठिकाणी, खरोखरच हे पाणी पाहताना अतिशय आनंद होत असल्याचे ते यावेळी म्हणाले.
खासदार विशाल पाटील म्हणाले, म्हैसाळ जत विस्तारित उपसा सिंचन योजनेचे काम चांगल्या पद्धतीने सुरू आहे. म्हैसाळ प्रकल्प हा २७० दिवसांत ५ टीएमसी पाणी नेण्याचा प्रकल्प असल्यामुळे त्याची ही क्युसेकची क्षमता आहे ती थोडी कमी आहे. जल आयोगाच्या मान्यतेचा प्रस्ताव पाठवत असताना तो जर १५० दिवसांत ५ टीएमसी पाणी न्यायचा जर प्रकल्प केला, तर या ठिकाणी कमी वेळात जास्त पाणी नेता जाईल. जिल्ह्यातील कडेगाव तालुक्यातील शामगाव व ढाणेवाडी तसेच मिरज तालुक्यातील सलगरे, कुकटोळी डोंगरवाडी या भागातील म्हैसाळ योजनेपासून वंचित गावांचे सर्वेक्षण करून या गावांना पाणी देण्याची मागणी केली. अन्य काही दुष्काळी भागातही उपसा सिंचन योजनेसाठी निधी देण्याची मागणी त्यांनी यावेळी केली. तसेच, M-CAD अंतर्गत जत तालुक्यासाठी पाठविलेल्या प्रस्तावास मंजुरी मिळावी अशी मागणी केली.
आमदार गोपीचंद पडळकर म्हणाले, दुष्काळाची परिस्थिती कायमची मिटावी, दुष्काळाचा भूतकाळ व्हावा, यासाठी सातत्याने लोकांच्याकडून मागणी होत राहिली. या पार्श्वभूमीवर जत तालुक्यातील ६५ गावातील शेतकऱ्यांच्यासाठी सुवर्णाक्षराने लिहावा असा हा आजचा दिवस आहे. या योजनेंतर्गत लाभ क्षेत्रातील गावांना पूर्ण क्षमतेने पाणी मिळण्यासाठी तिसरी लाईन टाकली तर विस्तारित म्हैसाळ योजनेच्या 65 गावांमधील अस्तित्वातील सर्व मोठे छोटे तलाव, खरीपामध्ये कृष्णा नदीच्या पाण्याने भरून देणे शक्य होणार आहे. यामुळे खरीपातील चार महिन्यांमध्ये विस्तारीत म्हैसाळच्या लाभ क्षेत्रातील तलावांना 4 टीएमसी पाण्याचा लाभ होऊ शकतो. जत तालुक्याला परत कुठलीही मागणी पाण्याच्या बाबत करावी लागणार नाही. विस्तारित म्हैसाळ योजना पूर्ण करण्यासाठी सन 2026-27 मध्ये 1 हजार कोटींची अर्थसंकल्पीय तरतूद करण्याची मागणी केली. नाबार्डमध्ये विस्तारीत म्हैसाळसाठी 900 कोटींची तरतूद केल्याने त्यांनी जलसंपदा मंत्री महोदयांचे आभार मानले. तसेच जत तालुक्यातील बोर नदीवर बॅरेज बांधण्याची मागणी केली. जत तालुक्यातील मध्यम प्रकल्प, साठवण तलाव दुरूस्ती व नव्याने काही साठवण तलाव करण्याची गरजही त्यांनी यावेळी व्यक्त केली. आता अस्तित्वात असलेल्या जुन्या म्हैसाळ योजनेमधून सिंचनासाठी किमान 350 क्युसेक्स विसर्ग जतला मिळण्याची मागणीही त्यांनी यावेळी केली.
प्रारंभी जलसंपदा मंत्री डॉ. राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या हस्ते कळ दाबून बोगदा कामाचा ब्लास्ट करण्यात आला तसेच कोनशीला अनावरण करण्यात आले. तसेच त्यांनी बोगदा कामाची पाहणी केली. त्याचबरोबर नकाशा व चित्रफितीच्या माध्यमातून या प्रकल्पाच्या कामाची माहिती घेतली.



