जागतिक पर्यावरण दिनानिमित्त ‘माझी वसुंधरा’ शपथ,पर्यावरण संवर्धनासाठी सामूहिक बांधिलकी आवश्यक विभागीय आयुक्तांकडून वृक्ष लागवड
अमरावती, प्रतिनिधी : जागतिक पर्यावरण दिनानिमित्त विभागीय आयुक्त कार्यालयात ‘माझी वसुंधरा अभियान’ अंतर्गत पर्यावरण संवर्धन व हवामान बदलाच्या आव्हानांचा सामना करण्यासाठी विभागीय आयुक्त नयना गुंडे यांनी अधिकारी कर्मचाऱ्यांना पर्यावरण संवर्धना संबंधीची विशेष शपथ दिली. या उपक्रमाद्वारे विभागातील सर्व नागरिक, लोकप्रतिनिधी, अधिकारी व कर्मचारी यांनी पर्यावरणपूरक जीवनशैली अंगीकारून पृथ्वीच्या रक्षणासाठी सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन विभागीय आयुक्तांनी यावेळी केले.
याप्रसंगी विभागीय आयुक्त श्रीमती गुंडे तसेच अपर आयुक्त अजय लहाने, संजय जाधव यांच्या हस्ते विभागीय आयुक्त कार्यालयाच्या परिसरात वृक्ष लागवड करुन अभियानात सर्वांनी सक्रीय सहभाग घेण्याचे आवाहन करण्यात आले.
‘माझी वसुंधरा’ शपथेमध्ये पृथ्वी, वायू, जल, ऊर्जा आणि आकाश या पंचमहाभूतांच्या संवर्धनासाठी विविध संकल्पांचा समावेश असून त्यानुसार प्रत्येकाने संकल्प घ्यावा. विशेष प्रसंगी किमान पाच वृक्ष लागवड करून त्यांचे संगोपन करणे, पर्यावरणपूरक वाहतूक साधनांचा वापर करणे, पाणी व विजेचा काटकसरीने वापर करणे तसेच सेंद्रिय खतांच्या साहाय्याने परसबाग विकसित करून इतरांनाही त्यासाठी प्रोत्साहित करणे, अशा महत्त्वपूर्ण बाबींचा शपथेमध्ये समावेश आहे, त्यानुसार सर्वांनी स्वयंस्फुर्तीने उपरोक्त बाबींचा आपल्या जीवनशैलीत अंगीकार करावा, असे आवाहन विभागीय आयुक्तांनी यावेळी केले.
हवामान बदलामुळे निर्माण होणाऱ्या आव्हानांवर मात करण्यासाठी प्रत्येक नागरिकाने आपल्या दैनंदिन जीवनात पर्यावरणपूरक सवयींचा अवलंब करणे आवश्यक असल्याचे या शपथेमध्ये अधोरेखित करण्यात आले आहे. पर्यावरण संवर्धन ही केवळ शासनाची जबाबदारी नसून प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य असल्याचा संदेश या अभियानातून देण्यात येत आहे.
अमरावती विभागातील सर्व जिल्ह्यांमधील ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषदांमधील पदाधिकारी, अधिकारी व कर्मचाऱ्यांनी ही शपथ घेण्याचे प्रशासनाकडून निर्देश देण्यात आले असून, सर्वांनी ऑनलाईन पोर्टलवर ई-शपथ (E-Pledge) घेणे अनिवार्य करण्यात आले आहे.
‘माझी वसुंधरा अभियान’ अंतर्गत राबविण्यात येत असलेल्या या उपक्रमामुळे पर्यावरण संरक्षणाबाबत जनजागृती वाढून हरित, स्वच्छ आणि शाश्वत भविष्यासाठी समाजामध्ये सकारात्मक परिवर्तन घडण्यास मदत होईल, असा विश्वास श्रीमती गुंडे यांनी यावेळी व्यक्त केला.