
मुंबई: एनसीबी अधिकारी समीर वानखेडे आणि काशिफ खान यांचे काय संबंध आहेत? काशिफ खानच्या विरोधात पुरावे देऊनही त्याला अटक का केली जात नाही? या प्रकरणातील व्हाईट दुबई कोण आहे? त्यालाही अटक का केली जात नाही?, असे सवाल राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केले आहेत.
नवाब मलिक यांनी आज सकाळीच ड्रग्ज प्रकरणी एक ट्विट करून खळबळ उडवून दिली. त्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेऊन या प्रकरणाची सविस्तर माहिती देतानाच एनसीबीवर प्रश्नांची सरबत्ती केली. मला एक व्हॉट्सअॅप चॅट मिळालं. त्यानुसार व्हाईट दुबई नावाचा व्यक्ती आहे. त्याची माहिती या चॅटमधून दिली जात आहे. केपी गोसावी फोटो पाठवायला सांगतात. त्यानंतर काशिफ खानचा फोटो पाठवला जातो. ज्या प्रमाणे फोटोच्या आधारे लोकांना ओळख करून ताब्यात घेतलं गेलं. त्याच पद्धतीने काशिफ खानला अटक का करण्यात आली नाही? त्याला सेफ पॅसेज का दिला? तो क्रुझवर दोन दिवस काय करत होता? असा सवाल मलिक यांनी केला
वानखेडेंची गोव्यात कारवाई का नाही?
काशिफ खान हा गोव्यात लपून बसला आहे. एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे हे झोनल डायरेक्टर असताना त्यांच्याकडे गोव्याचा चार्ज होता. गोव्यात ड्रग्ज टुरिझम चालतं हे जगभरातील लोकांना माहीत आहे. रशियन माफीया हे ड्रग्जचं रॅकेट चालवतात. पण गोव्यात कोणतीही कारवाई होत नाही. कारण काशिफ खानकडून गोव्यात हे रॅकेट चालवलं जातं. काशिफ खान आणि वानखेडेंचे घनिष्ठ संबंध आहेत. त्यामुळे काशिफवर कारवाई होत नाही. तुम्ही काशिफ खानला का बोलवत नाही? व्हाईट दुबईला का अटक झाली नाही? अशी माझी तुम्हाला विचारणा आहे, असं मलिक म्हणाले.
काशिफला का वाचवलं जात आहे?
काशिफ खान आणि वानखेडे यांचे काय संबंध आहेत? त्याची माहिती एनसीबीने द्यावी. काशीफवर देशभरात गुन्हे आहेत. चार दिवसांपूर्वी त्याच्यावर फसवणुकीची गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याला का वाचवलं जात आहे हे सांगावं. एका कोर्टाने त्याला फरार घोषित केलं आहे. तरीही त्याला का वाचवलं जात आहे? असा सवालही त्यांनी केला.



