
शेतकरी हिताच्या निर्णयासाठी विशेष अधिवेशन बोलावण्याची मागणी
रमेश औताडे , मुंबई याच कडून
मुंबई प्रतिनिधी: शेतकरी वर्गाच्या सर्व प्रलंबित मागण्यासाठी सरकारने विशेष अधिवेशन बोलावून शेतकरी हिताचे निर्णय घ्यावे. या मागणीसाठी अहमदनगर येथील शेतकऱ्यांनी आझाद मैदानात आंदोलन सुरू केले आहे.
शेतकरी आत्महत्या, महागाईच्या काळात शेतीमालाला योग्य हमीभाव, कायद्याचे संरक्षण, नैसर्गिक आपत्तीत शेतकऱ्यांना तात्काळ भरीव मदत, शेतीमालाचे भाव पडल्यानंतर शेतीमालाच्या मार्केटिंग साठी केंद्र व राज्य सरकारने मदत करावी, केंद्र सरकारच्या चुकीच्या शेतीमाल आयात निर्यात धोरणामुळे झालेले शेतकऱ्यांचे कर्ज माफ करावे, शेतकऱ्याच्या आत्महत्याग्रस्त कुटुंबातील महिलेला मासिक वेतन देण्यात यावी, या व इतर मागणीसाठी आझाद मैदान येथे शेकडो शेतकऱ्यांनी आंदोलन सुरू केले आहे.
मागील वर्षी एकाच वर्षात चार वेळा नैसर्गिक आपत्ती येऊन पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. निर्यात बंदी मुळे कांद्याला भाव मिळत नाही. कापसाला भाव मिळत नाही सोयाबीनला भाव मिळत नाही. दुष्काळामुळे उत्पन्न कमी आले आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांनी कसे जगायचे ? असा सवाल यावेळी अहमदनगरचे शेतकरी बाळासाहेब शिंदे यांनी केला.
नैसर्गिक आपत्तीत अद्यापही लाखो शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळाली नाही. केंद्र सरकारने शेतीमाल आयात निर्यात धोरण चुकीचे करून शेतीमालाचे भाव पाडले आहेत. शेतकऱ्यांना आर्थिक व मानसिक संकटात आणले आहे. त्यामुळे शेतकरी कर्जबाजारी होऊन आत्महत्या करत आहे. त्यामुळे आम्ही शेतकऱ्यांनी जगायचे कसे ? हे सरकारने आम्हाला सांगावे नाहीतर आम्हा शेतकऱ्यांना इच्छा मरणाची परवानगी द्यावी. अशी मागणी हे शेतकरी करत आहेत.
शेतकऱ्यांच्या बाबतीत प्रश्न ऐकून घेण्याची व ते प्रश्न सोडविण्याची इच्छा सरकारची दिसत नाही. आता जर सरकारने न्याय दिला नाही तर आम्ही हे उपोषण मागे घेऊन मुंबई ते दिल्ली लोटांगण आंदोलन करून केंद्र सरकारकडे दिल्ली येथे जंतर मंतर येथे उपोषण करणार असा इशारा या शेतकऱ्यांनी यावेळी दिला.
फोटो आहे
.



