
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे शिष्यवृत्ती योजनेसाठी विद्यार्थ्यांनी अर्ज सादर करावेत
जालना, प्रतिनिधी:- साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ (मर्या.) जिल्हा कार्यालय जालना मार्फत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे शिष्यवृत्ती योजना राबविण्यात येत आहे. योजनेसाठी मातंग समाज व तत्सम 12 पोटजातीतील सन 2023-24 या शैक्षणिक वर्षात दहावी, बारावी, पदवी, पदव्युत्तर, वैद्यकिय व अभियांत्रिकी इत्यादी अभ्यासक्रमामध्ये विशेष प्राविण्याने गुणवत्ता मिळवुन 60 टक्के गुण किंवा त्यापेक्षा जास्त गुण प्राप्त झालेल्या विद्यार्थी-विद्यार्थीनींनी साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाच्या जिल्हा कार्यालयात बुधवार दि.24 जुलै 2024 पर्यंत अर्ज सादर करावेत, असे आवाहन जिल्हा व्यवस्थापक व्ही. एस. सोनवणे यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे शिष्यवृत्ती योजना वितरण करण्यासाठी जास्त टक्केवारी प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांची गुणानुक्रमानुसार निवड मुख्यालय मुंबई यांच्याकडुन उपलब्ध निधीच्या प्रमाणात केली जात असते.
अर्जदाराचा जातीचा दाखला, अर्जदाराच्या कुटुंबाच्या उत्पन्नाचा दाखला, शिधापत्रिका, आधारकार्ड, गुणपत्रक, दोन पासपोर्ट आकाराची छायाचित्र, बोनाफाईड किंवा पुढील वर्षात प्रवेश घेतल्याची पावती आदि कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे. अर्जदाराने साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ (मर्या.) भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, जालना येथे बुधवार दि.24 जुलै 2024 पर्यंत अर्ज सादर करावेत. असेही प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.



