भारतपर्व महोत्सवात महाराष्ट्राचा ‘मधाचे गाव’ संकल्पनेवर आधारित चित्ररथ..
नवी दिल्ली प्रतिनिधी-: लाल किल्ला परिसरात भारत पर्व महोत्सवाचे आयोजन प्रजासत्ताक दिनानिमित्त होणार असून या महोत्सवास महाराष्ट्र राज्याचा ‘मधाचे गाव’ या संकल्पनेवर आधारित चित्ररथ असणार आहे.
दरवर्षी केंद्रीय पर्यटन मंत्रालयाच्यावतीने लाल किल्ला येथे भारतपर्व महोत्सवाचे आयोजन प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यानिमित्त केले जाते. यावर्षी या महोत्सवात महाराष्ट्राचा चित्ररथ दर्शविण्यात येणार आहे. महाराष्ट्रासह बारा राज्यातील चित्ररथ ही इथे असणार आहेत. दिनांक 26 ते 29 जानेवारी दरम्यान भारतपर्व महोत्सव चालेल.
हे वर्ष संविधानाचे अमृत महोत्सव वर्ष म्हणून साजरे केले जात असून, यावर्षी चित्ररथांसाठी ‘सुवर्ण भारत : वारसा आणि विकास’ ही मध्यवर्ती संकल्पना आहे. या संकल्पनेच्या आधारावर महाराष्ट्र राज्याने ‘मधाचे गाव’ असा चित्ररथ तयार केला.
मधमाशांचे पर्यावरणाच्या आणि मानवी जीवनाच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्व आहे.मधाचे व्यावसायिक महत्त्व लक्षात घेऊन, स्थानिक रोजगार निर्मिती आणि उत्पन्नाचे स्रोत निर्माण करण्यासाठी, महाराष्ट्र शासनाने 2022 मध्ये ‘मधाचे गाव’ ही योजना सुरू केली. या योजनेचा मुख्य उद्देश स्थानिक रोजगार निर्मिती करणे आणि गावे आर्थिक दृष्ट्या सक्षम करणे हा आहे. त्याचबरोबर पर्यटन व पर्यावरण यासाठीही ही योजना महत्त्वाची आहे.