मुंबई-गोवा महामार्गावरील प्रलंबित कामे तात्काळ पूर्ण करावीत –जिल्हाधिकारी किशन जावळे
रायगड( प्रतिनिधी- मुंबई- गोवा महामार्गावर अपूर्ण असलेल्या कामांमुळे आणि खड्डयांमुळे प्रवाशांची मोठ्या प्रमाणावर गैरसोय होत आहे. या महामार्गावर होणारी वाहतूक कोंडी टाळून नागरिकांचा प्रवास सुरक्षित होण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने महामार्गावरील बायपास, सर्व्हीस रोड यांचे मजबुतीकरण करुन गणेशोत्सवापूर्वी हा महामार्ग खड्डेमुक्त करावा, असे निर्देश जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित मुंबई-गोवा महामार्गाच्या कामाच्या सद्य:स्थितीबाबत तसेच महामार्गावर होणाऱ्या अपघातांबाबतच्या आढावा बैठकीत ते बोलत होते.
या बैठकीला जिल्हा पोलीस अधिक्षक आचल दलाल, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी महेश देवकाते, राष्ट्रीय महामार्ग प्रकल्प संचालक यशवंत घोटकर, उपजिल्हाधिकारी (भूसंपादन) श्रीकांत गायकवाड वाहतूक पोलीस निरीक्षक श्री.सोमनाथ लांडे, तसेच संबंधित यंत्रणेचे क्षेत्रीय अधिकारी, संबंधित ठेकेदार उपस्थित होते.
यावेळी जिल्हाधिकारी श्री.जावळे म्हणाले की, गणेशोत्सवादरम्यान मुंबई-गोवा महामार्गावरुन लाखो चाकरमनी कोकणात जातात. या काळात त्यांचा प्रवास सुखकर आणि सुरक्षित होणे आवश्यक आहे. ज्या ठिकाणी पुलांची बांधकामे सुरु आहेत त्याठिकाणी वाहतूक गतिमान होईल यासाठी खड्डे तात्काळ बुजवावे. संपूर्ण महामार्गावर दिशादर्शक बॅनर, बाण ठळक पणे लावावे. आवश्यकतेप्रमाणे ठीक ठिकाणी रिफ्लेक्टर लावावेत, गरज असलेल्या पुलावर सुरक्षेसाठी सुरक्षा जाळ्या लावाव्यात. रायगड जिल्ह्यातील पर्यायी मार्गाचे आवश्यकते प्रमाणे तात्काळ डागडुजी, दुरुस्ती करण्याबाबत यावेळी जिल्हाधिकारी यांनी सांगितले. महामार्गाच्या कामामध्ये प्रास्तावित असलेल्या सर्व सर्विस रोड, भुयारी मार्ग, साईड पट्ट्या यांचे काम प्राध्यान्याने पूर्ण करावे. सर्व संबंधित यंत्रनेने काम पूर्ण झाले की नाही याची खातरजमा करावी. महामार्गाचे काम हा जिल्हाप्रशासनाचा प्राधान्याचा विषय आहे. मुंबई-गोवा महामार्गाचे काम अनेक वर्षापासून सुरु असून अपूर्ण काम व कामाच्या अनियमिततेमुळे महामार्गावर होणाऱ्या अपघातांची संख्या वाढत आहे. तसेच आगामी येणारे सण, उत्सव इत्यार्दीचे अनुषंगाने मुंबई गोवा महामार्गाच्या कामाच्या सद्य:स्थितीबाबत व कार्यवाहीचा आढावा त्यांनी यावेळी घेतला.
तसेच गणेशोत्सवादरम्यान माणगाव, इंदापूर या शहरात होणारी वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी पोलीस प्रशासनाने आणि महामार्ग प्राधिकरण यांनी ट्राफिक वार्डन नेमण्यात यावेत या ठिकाणची वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी संबंधित यंत्रणानी विशेष काळजी घ्यावी.