परमवीर चक्र विजेत्यांना समर्पित असलेले पहिले उद्यान,अत्याधुनिक सुविधायुक्त मासळी बाजाराचे भूमिपूजन-विकासासोबतच संस्कृतीच्या संवर्धनाला प्राधान्य – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस‘वंदे मातरम्’ उद्यानाचे लोकार्पण
राज्य प्रतिनिधी-
देशाच्या वीर सैनिकांना समर्पित असलेले वंदे मातरम या संकल्पनेवर आधारित असलेले आणि परमवीर चक्र विजेत्यांना समर्पित असलेले देशातील पहिले भव्य उद्यान नागपुरात साकारले आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नुकतेच या उद्यानाचे लोकार्पण करण्यात आले.
या उद्यानामध्ये देशासाठी सर्वोच्च बलिदान देणाऱ्या एकवीस परमवीर चक्र विजेत्यांचे पुतळे उभारण्यात आले आहेत. त्यांच्या अतुलनीय शौर्याची गाथा आणि माहिती सर्वसामान्य जनतेपर्यंत प्रभावीपणे पोहोचवली जाईल. मुख्यमंत्री फडणवीस यांचा विश्वास: लोकार्पण सोहळ्याप्रसंगी बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, या उद्यानाच्या माध्यमातून नागरिकांमध्ये देशसेवेची व राष्ट्रनिर्माणाची भावना अधिक तीव्रतेने जागृत होईल. उद्यानाची संपूर्ण रचना आणि संकल्पना वंदे मातरम या देशभक्तीपर भावनेवर आधारित आहे, ज्यामुळे येथे भेट देणाऱ्या प्रत्येकाला राष्ट्रीय एकात्मतेची आणि शौर्याची प्रेरणा मिळेल.
वंदे मातरम् हे गीत भारताच्या क्रांतीचा मंत्र होता. याला 150 वर्षे पूर्ण होत असताना अशा प्रकाराच्या देशातील पहिल्या वंदे मातरम् उद्यानाचे लोकार्पण होत आहे. ही सर्वांसाठी अभिमानाची व गौरवाची बाब असून नागपूर शहरातील पायाभूत सुविधांच्या विकासाबरोबरच संस्कृतीच्या संवर्धनालाही सर्वोच्च प्राधान्य आहे, या उद्यानात लेझर शोसाठी आवश्यक निधी तात्काळ उपलब्ध करुन देण्यात येईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
बजोरिया भागातील एम्प्रेस मिलच्या जागेवर स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त तयार करण्यात आलेल्या वंदे मातरम् उद्यानाचे लोकार्पण तसेच प्रधानमंत्री मत्स्यसंपदा योजनेंतर्गत भांडेवाडी येथे उभारण्यात येणाऱ्या अत्याधुनिक सुविधायुक्त मासळी बाजाराचे भूमिपूजन मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते झाले, त्यावेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
यावेळी मत्स्यव्यवसाय विकास मंत्री नितेश राणे यावेळी प्रमुख पाहूणे म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमास आमदार सर्वश्री प्रवीण दटके, कृष्णा खोपडे, माजी आमदार विकास कुंभारे, अनिल सोले, गिरीश व्यास, माजी महापौर दयाशंकर तिवारी, मत्स्यव्यवसाय विकास विभागाचे सचिव रामास्वामी एन., महानगर पालिका आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी, अतिरिक्त आयुक्त श्रीमती वसुमना पंत, वैष्णवी बी. आदी पदाधिकारी व अधिकारी उपस्थित होते.