
क्षयरोग मुक्त ४२ ग्रामपंचायत सन्मानित जनजागृती, निदान व उपचार हीच क्षयरोग मुक्तीची त्रिसुत्री- जिल्हाधिकारी दिलीप स्वामी
छत्रपती संभाजीनगर (जिमाका)- क्षयरोग मुक्तीसाठी जनजागृती, लवकर निदान आणि परिपूर्ण उपचार ही त्रिसुत्री असून तिचा अवलंब रुग्ण,त्याचे नातेवाईक, वैद्यकीय पथके या सगळ्यांनी करायला हवा. त्यातूनच आपल्या जिल्ह्यातून आपण क्षयरोग हद्दपार करु शकू,असे प्रतिपादन जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी आज येथे केले.
जिल्ह्यातील ४२ ग्रामपंचायती ह्या क्षयरोग मुक्त ग्रामपंचायती घोषित करण्यात आल्या. त्यांचा पुरस्कार वितरण सोहळा आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन सभागृहात पार पडला. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. गणेश कल्याणकर, जागतिक आरोग्य संघटनेचे क्षेत्रसमन्वयक डॉ. कौस्तुभ दासगुप्ता, वैद्यकीय अधिकारी डॉ. पंडीत राठोड आदी यावेळी उपस्थित होते.
क्षयरोग मुक्त भारत या अभियानाअंतर्गत केंद्र शासनाने जिल्ह्यात क्षयरोग मुक्तीचे विविध निकष ठरवून दिले. त्यात सन २०२३ मध्ये जिल्ह्यातील ४२ ग्रामपंचायतींनी सर्व निकष पूर्ण केले . यात प्रामुख्याने यशस्वी उपचार, नियमित औषधोपचार तसेच निक्षय पोषण योजनेअंतर्गत प्रतिरुग्ण ५०० रुपये दरमहा चे १०० टक्के वितरण, रुग्णाला दत्तक घेऊन त्यास पौष्टिक आहार किट वाटप इ. निकष होते. या निकषांवर काम करुन आपली ग्रामपंचायत क्षेत्र क्षयरोग मुक्त करण्याचे काम या ४२ ग्रामपंचायतींनी केले. त्याबद्दल त्यांना गौरविण्यात आले.
जिल्हाधिकारी स्वामी यांनी ग्रामपंचायतींच्या कार्याचे कौतुक करत,आता यात सातत्य ठेवावे व जिल्ह्याला क्षयरोग मुक्त करण्याचे उद्धिष्ट ठेवून त्यादृष्टीने प्रयत्न करावे असे आवाहन त्यांनी केले.
जानेवारी २०२४ पासून जिल्ह्यात महापालिका क्षेत्रात २५२३ तर ग्रामिण भागात १२९८ इतके क्षयरुग्ण आढळून आले असून ते सर्व नियमित उपचारांखाली आहेत,अशी माहिती जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. गणेश कल्याणकर यांनी दिली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दीपा ढगे यांनी केले तर डॉ.पंडीत राठोड यांनी आभार प्रदर्शन केले.
०००००



