
मुंबईसह उपनगरांमध्ये पावसाची धुव्वाधार बॅटिंग, रेल्वेनं प्रवास करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी…
[ मुंबई प्रतिनिधी
: मान्सून कधी येतो करता करता आता तो आला आणि चांगलाच स्थिरावलाही आहे. जवळपास दोन दिवसांपासून मुंबई शहर, उपनगर आणि कोकण पट्ट्यामध्ये पावसाची जोरदार बॅटिंग सुरु आहे. मुंबईमध्ये कुलाब्यापासून अगदी अंधेरी आणि त्यापुढील परिसरात, तर तिथे ठाणे, कल्याण – डोंबिवलीतही पावसानं दमदार हजेरी लावली.
नवी मुंबईतही पावसाची हजेरी वातावरणात थंडावा आणून गेली. हवामान खात्याकडून वर्तवण्यात आलेल्या अंदाजानुसार येत्या 24 तासांत मुसळधार होणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. हवामान खात्याकडून या भागात ऑरेंज अलर्टही देण्यात आला आहे.
मागील दोन दिवसांपासून झालेल्या सततच्या पावसामुळे मुंबई आणि आसपासच्या परिसरात साचल्याच्याही घटना घडल्या आहेत. मुंबईतील दादरजवळ हिंदमाता परिसरात पाणी साचलं आहे. दरवर्षी पावसाळ्यात हिंदमाता भागात पाणी साचतं. मुंबई महानगरपालिका दरवर्षी पाणी साचू नये म्हणून उपाययोजनाही करते मात्र परिस्थिती जैसे थे आहे.
पावसाचे थेट परिणाम मुंबईच्या लोकलवरही झाले आहेत. काही मिनिटांच्या उशिरानं रेल्वे धावत आहेत. तर, रस्ते वाहतुकीवरही पावसाचे परिणाम दिसून येत आहेत. अंधेरी सब वे पाण्याखाली गेल्याचं पाहायला मिळालं तर, काही वाहने या पाण्यात अडकली होती. सखल भागात पाणी साचल्यानं पश्चिम उपनगरांतील अनेक भागात वाहतूक खोळंबली होती.



