अमरावती, आरोग्य प्रतिनिधी : राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम हा जिल्ह्यातील हजारो बालकांना आशेचा किरण ठरला आहे. या महत्त्वाकांक्षी उपक्रमात गंभीर आजारग्रस्त असलेल्या बालकांना नवजीवन देण्यात आले आहे. मागील काही वर्षांत जिल्ह्यात 879 हृदय शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आल्या आहे. याशिवाय 4 हजार 547 इतर शस्त्रक्रिया करून गरजू कुटुंबांना मोठा दिलासा देण्यात आला आहे. या सर्व शस्त्रक्रियांसाठी बालकांच्या पालकांना एक रुपयाही खर्च करावा लागलेला नाही.
आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांच्या मार्गदर्शनाखाली या योजनेची प्रभावी अंमलबजावणी केली जात आहे. अंगणवाडी ते शाळा स्तरावरील प्रत्येक बालकापर्यंत पोहोचून संपूर्ण बालकांचे स्क्रीनिंग करण्यात आले आहे. दुर्गम भागातही आरोग्य सेवा पोहोचवून आजारांचे वेळेत निदान करणे ही या योजनेची खरी ताकद ठरली आहे.
योजनेत जन्मजात हृदय रोग, जन्मजात नेत्र रोग, जन्मजात कर्णदोष, दुभंगलेले ओठ व टाळू, हर्निया व हायड्रोसील, डोळ्यांचा तिरळेपणा, दंतरोग, फायमोसीस, हाडांचे इतर आजार आणि टॉन्सिल्स या प्रमुख शस्त्रक्रिया करण्यात आल्या. या मोहिमेत नामवंत रुग्णालयांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. यात अमरावती येथील विभागीय संदर्भ सेवा रुग्णालय, डॉ. पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालय, डॉ. पाटील कान, नाक, घसा हॉस्पिटल, आचार्य विनोबा भावे रुग्णालय, सावंगी, कोकिळाबेन धीरुभाई अंबानी हॉस्पिटल, मुंबई, एसआयसीसी चिल्ड्रन हॉस्पिटल, मुंबई, नेल्सन हॉस्पिटल, नागपूर, किम्सवे हॉस्पिटल, नागपूर, स्वास्थम हॉस्पिटल, नागपूर आणि संजीवनी हॉस्पिटल, मुंबई यांनी प्रमुख शस्त्रक्रिया केली
जिल्हा पातळीवर कार्यरत असलेल्या पथकांमार्फत तालुकास्तरावर बालकांना मोफत सेवा पुरविली जात आहे. जिल्ह्यातील बालकांना दुर्धर आजार असल्यास या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. विनोद पवार यांनी केले आहे.