
रोजगार मेळाव्याच्या प्रभावी नियोजनासाठी बैठक;
महाविद्यालयांच्या सक्रिय सहभागावर भर
सांगली, प्रतिनिधी : जिल्ह्यातील बेरोजगार युवक-युवतींना अधिकाधिक रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी तसेच आगामी जिल्हास्तरीय रोजगार मेळावा प्रभावीपणे आयोजित करण्याच्या दृष्टीने जिल्ह्यातील विविध महाविद्यालयांच्या ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर्स (TPO) यांच्या नियोजन बैठकीत महाविद्यालयांच्या सक्रिय सहभागावर भर देण्यात आला.
जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगारांना रोजगार व स्वयंरोजगार उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने नियोक्ते, कारखानदार, व्यापारी व सुशिक्षित बेरोजगार यांचे एकत्रित रोजगार मेळावे आयोजित करण्याच्या अनुषंगाने ही बैठक घेण्यात आली. सांगली मिरज एमआयडीसी मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशनच्या सभागृहात झालेल्या या बैठकीस जिल्हास्तरीय रोजगार मेळावे समन्वय समितीच्या अध्यक्ष काव्यश्री नलावडे, कौशल्य विभागाच्या सहायक आयुक्त इनुजा शेख, जिल्हा माहिती अधिकारी संप्रदा बीडकर, सांगली मिरज एमआयडीसी मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशनचे अध्यक्ष विनोद पाटील, उद्योजक संजय खांबे, चितळे उद्योग समुहाचे शशिकांत कुलकर्णी आदि मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
रोजगार मेळाव्यात विद्यार्थ्यांचा आणि माजी विद्यार्थ्यांचा मोठ्या प्रमाणावर सहभाग सुनिश्चित करून त्यांना अधिकाधिक गुणवत्तापूर्ण रोजगार उपलब्ध करून देण्याच्या अनुषंगाने चर्चा करण्यात आली. या बैठकीत खासगी क्षेत्रातील लहान, मध्यम व मोठे उद्योग, कंपन्या, रुग्णालये आदिंना आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हास्तरीय रोजगार मेळाव्यातून सकारात्मक फलप्राप्ती होण्याच्या दृष्टीने सर्वंकष चर्चा करण्यात आली. तसेच, जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयांमधून नुकतेच शिक्षण पूर्ण केलेले तसेच मागील तीन वर्षांत शिक्षण पूर्ण करूनही रोजगाराच्या शोधात असलेल्या माजी विद्यार्थ्यांपर्यंत रोजगार मेळाव्याची माहिती पोहोचविण्याबाबत चर्चा करण्यात आली. जास्तीत जास्त बेरोजगार उमेदवारांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी महाविद्यालयांनी सक्रिय भूमिका बजावावी, विद्यार्थ्यांची नोंदणी वाढवावी तसेच उद्योग-व्यवसाय क्षेत्राच्या गरजेनुसार उमेदवारांना सहभागी करून घ्यावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले.
यावेळी जिल्हास्तरीय मेळाव्याची सद्यस्थिती, उद्योगांच्या नेमक्या गरजा व मनुष्यबळ मिळण्यात येणाऱ्या अडचणी, रोजगाराची क्षेत्रिय संधी आणि रिक्त पदे, रोजगार मेळाव्याचे नियोजन, जनजागृती, ग्रामीण भागातील बेरोजगार पुरूष व महिला उमेदवार यांचा सहभाग वाढविण्यासाठी उपाययोजना, आयटीआय, तंत्रशिक्षण महाविद्यालये, उद्योजक व कंपन्या यांच्यातील समन्वय, उद्योजकांचा प्रतिसाद, आस्थापना व उमेदवारांची नोंदणी आणि रोजगार मेळाव्यानंतरचा पाठपुरावा याबाबत सविस्तर विचारमंथन करण्यात आले.



