मराठी भाषा जतन आणि संवर्धनासाठी प्रभावी कृती आराखडा राबवा-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली राज्य मराठी विकास संस्थेच्या नियामक मंडळाची बैठक
मराठी भाषा जतन आणि संवर्धनासाठी प्रभावी कृती आराखडा राबवा-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली राज्य मराठी विकास संस्थेच्या नियामक मंडळाची बैठक
मुंबई, प्रतिनिधी : मराठी भाषा, साहित्य आणि बोलींच्या जतन आणि संवर्धनासाठी प्रभावी कृती आराखडा तयार करून त्याची अंमलबजावणी करावी; तसेच राज्य मराठी विकास संस्थेच्या कामकाजात सातत्य, पारदर्शकता आणि परिणामकारकता यावी यासाठी वर्षभरातील सर्व वैधानिक बैठकींचे वेळापत्रक आगाऊ निश्चित करावे, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.
सह्याद्री अतिथीगृह येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली राज्य मराठी विकास संस्थेच्या नियामक मंडळाची बैठक झाली, त्यावेळी ते बोलत होते. मराठी भाषा मंत्री डॉ. उदय सामंत, मराठी भाषा विभागाचे सचिव डॉ.किरण कुलकर्णी, राज्य मराठी विकास संस्थेचे संचालक डॉ. श्यामकांत देवरे, साहित्य संस्कृती मंडळाचे अध्यक्ष डॉ.सदानंद मोरे, भाषा संचालक अरुण गीते; तसेच राज्य मराठी विकास संस्थेचे अशासकीय सदस्य प्रत्यक्ष व दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठकीस उपस्थित होते.
राज्य मराठी विकास संस्थेची सर्व वैधानिक अनुपालने पूर्ण झाल्याबद्दल मुख्यमंत्री फडणवीस यांनी संस्थेचे अभिनंदन केले. ते म्हणाले की, संस्थेचा गेल्या काही वर्षांचा प्रशासकीय व वैधानिक अनुशेष (बॅकलॉग) पूर्ण झाल्याने संस्थेची प्रशासकीय रचना अधिक सक्षम झाली आहे. आता मराठी भाषेचा प्रचार, प्रसार, संशोधन आणि संवर्धन यासाठी ठोस धोरणे राबविण्यावर भर देणे आवश्यक आहे. संस्थेच्या कर्मचाऱ्यांचे प्रलंबित प्रश्नही सकारात्मक भूमिकेतून सोडविण्यात येतील.
बैठकीत सदस्यांनी मराठी भाषा आणि विविध बोलींच्या संवर्धनासाठी अनेक महत्त्वपूर्ण सूचना मांडल्या. ‘पुस्तकांचे गाव’ आणि ‘पेटी वाचनालय’ उपक्रमांचा विस्तार करून आदिवासी व सीमावर्ती भागातील मराठी शाळांपर्यंत दर्जेदार साहित्य पोहोचविणे, झाडीबोली आणि पूर्व विदर्भातील नाट्यपरंपरेच्या जतनासाठी गडचिरोली-वडसा परिसरात नाट्य संकुल उभारणे, भारुड, गोंधळ, पोवाडा यांसारख्या लोककलांच्या माध्यमातून मराठीचा वारसा जपणे; तसेच बालसाहित्य आणि बालग्रंथालयांना प्रोत्साहन देण्याबाबत सूचना मांडल्या. या सर्व सूचनांचा सकारात्मकतेने विचार करण्यात येणार असल्याची मुख्यमंत्र्यांनी ग्वाही दिली.
तंजावर येथील मोडी लिपीतील सुमारे १५ लाख ऐतिहासिक कागदपत्रांच्या डिजिटायझेशन प्रकल्पाच्या प्रगतीचा मुख्यमंत्री फडणवीस यांनी आढावा घेतला; तसेच लंडन येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाने उभारण्यात येणाऱ्या जागतिक मराठी केंद्राच्या कामालाही गती देण्याबाबत यावेळी चर्चा झाली.
मंत्री सामंत यांनी सांगितले की, मराठी भाषेचा जागतिक स्तरावर प्रसार करण्यासाठी ७५ आंतरराष्ट्रीय बृहन्महाराष्ट्र मंच उभारण्याची प्रक्रिया सुरू आहे. जवाहरलाल नेहरू विद्यापीठात कुसुमाग्रज यांच्या नावाने अध्यासन केंद्र; तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या गनिमी काव्यावर पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरू करण्यात आला आहे. विविध भारतीय आणि जागतिक भाषांतील दर्जेदार साहित्य मराठीत उपलब्ध करून देण्यासाठी यशवंतराव चव्हाण यांच्या नावाने ‘अनुवाद समिती’ स्थापन करण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे.