
जिल्हा प्रशासनाचे शून्य प्रलंबितता अभियान;कालबद्ध कार्यक्रमाची अंमलबजावणी करा- जिल्हाधिकारी दिलीप स्वामी
राज्य प्रतिनिधी- प्रलंबित कामांचा निपटारा करुन शून्य प्रलंबितता गाठण्यासाठी जिल्हा प्रशासनाने आजपासून शून्य प्रलंबितता अभियान सुरु केले आहे. या अभियानाचा कालबद्ध कार्यक्रम आखण्यात आला असून दि.३० जुलै रोजी प्रत्येक कार्यालयाने शून्य प्रलंबितता घोषित करावी,असे निर्देश जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी आज दिले.
जिल्हाधिकारी कार्यालय, उपविभागीय कार्यालय, तहसिलदार कार्यालय व अन्य अनुषंगिक कार्यालयांमध्ये विविध अर्ज, निवेदने, तक्रारी इ. प्रलंबित असल्याचे दिसून येत आहे. नागरिकांचे कामे वेळेवर होत नसल्याने प्रशासनाची प्रतिमा मलिन होते. त्यासाठी शून्य प्रलंबितता अभियान राबविण्याचे जिल्हा प्रशासनाने ठरवले असून आज (दि.२) जिल्हास्तरीय प्रशिक्षण देऊन या अभियानाची सुरुवात करण्यात आली.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या जिल्हा नियोजन सभागृहात आज जिल्हास्तरीय प्रशिक्षण घेण्यात आले. जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, अपर जिल्हाधिकारी डॉ. अरविंद लोखंडे, निवासी उपजिल्हाधिकारी विनोद खिरोळकर तसेच सर्व उपजिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी, तहसिलदार व अधिकारी- कर्मचारी प्रशिक्षणास उपस्थित होते.
जिल्हाधिकारी स्वामी यांनी हे प्रशिक्षण दिले. जिल्हाधिकारी स्वामी यांनी सांगितले की, दि.३० जून २०२४ ही अंतिम तारीख ठरवून त्या तारखेपर्यंतची सर्व पत्र, निवेदने, तक्रारी यांचा आढावा घेऊन त्यांचा निपटारा करण्यासाठी कालबद्ध कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे.
कालबद्ध कार्यक्रम
जिल्हास्तरीय प्रशिक्षण दि.२ जुलै, उपविभागीय अधिकारी/ तहसिलदार कार्यालय स्तरावर प्रशिक्षण दि. ३ ते ७ जुलै, प्रत्यक्ष कामकाज, स्वच्छता , छाननी, वर्गवारी, प्रलंबितता शोध मोहिम दि.७ ते १७ जुलै, तक्रार निवारण दिवस घेणे- दि.२० ते २२ जुलै. प्रलंबित प्रकरणांची सुनावणी घेऊन निकाली काढणे दि.२३ ते २८ जुलै, सर्व प्रपत्रात माहिती पाठविणे दि.२८ ते २९ जुलै व शून्य प्रलंबितता घोषित करणे दि.३० जुलै.
कार्यालयीन दप्तर सुसूत्रिकरण
प्रलंबितता निपटारा करतांनाच कार्यालयीन दप्तराचे अद्यावतीकरण, सहा गठ्ठा पद्धतीने अभिलेखे लावणे, दप्तराच्या नोंद वह्या अद्यावत करणे, अभिलेख कक्ष अद्यावत करणे ही कामे केली जाणार आहेत. संपूर्ण कार्यालयाची साफसफाई, नस्ती तपासणी, कागदपत्रे तपासणे, त्यांचे वर्गीकरण करणे, गठ्ठे तयार करणे, सुचि तयार करणे, कार्यालय व्यवस्थापन करणे, कार्यालये पर्यावरण पूरक करण्यासाठी प्रयत्न करणे, अभ्यागतांना बसण्याची , पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करणे इ. कामे या अभियानांतर्गत करण्यात यावी असे निर्देश जिल्हाधिकारी स्वामी यांनी दिले.
०००००



