नवी मुंबईत विद्यार्थ्यांनी चित्रांमधून दर्शविले वसुंधरा व पर्यावरण संरक्षण, संवर्धनाचे महत्त्व…
नवी मुंबई प्रतिनिधी- महाराष्ट्र शासनाच्या पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाच्या वतीने जाहीर करण्यात आल्याप्रमाणे 22 एप्रिल रोजीच्या जागतिक वसुंधरा दिनापासून 1 मे रोजीच्या महाराष्ट्र दिनापर्यंत वसुंधरा व पर्यावरण संवर्धक विविध उपक्रम राबविले जात आहेत. नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीनेही महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली व्यापक लोकसहभागातून विविध उपक्रम राबविले जात आहेत. यामध्ये देशाचे उद्याचे भविष्य असणाऱ्या विद्यार्थ्यांना सहभागी करून त्यांच्यामध्येही पर्यावरण विषयक जागृती व वसुंधरा संवर्धनाची गोडी वृद्धिंगत केली जात आहे.
या अनुषंगाने नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील शाळांमध्ये शिक्षण विभागाच्या उपायुक्त श्रीम संघरत्न खिल्लारे यांच्या नियंत्रणाखाली पर्यावरण समस्या व उपाययोजना या विषयावर विद्यार्थ्यांच्या मनात असलेल्या संकल्पनांना चित्राच्या रूपात अविष्कृत करण्यासाठी चित्रोत्सव हा अभिनव उपक्रम राबविण्यात आला.
विद्यार्थ्यांनी या विषयानुरूप चित्रे काढून चित्रांच्या माध्यमातून पर्यावरण संवर्धन हे आपलं राष्ट्रीय कर्तव्य आहे याची जाणीव जागृती केली. यामध्ये विद्यार्थ्यांनी आपल्या कल्पकतेने जलप्रदूषण, वायू प्रदूषण, ध्वनी प्रदूषण तसेच प्लास्टिकचा भस्मासूर, वृक्षतोड अशा पर्यावरण विषयक विविध विषयांवर चित्रे काढून वसुंधरा संरक्षण व संवर्धन याविषयी बहुमूल्य संदेश दिला.
काही शाळांतील शिक्षकांनी आपल्या शालेय परिसरात विद्यार्थ्यांना नेऊन नवी मुंबई महानगरपालिकेमार्फत स्वच्छ भारत अभियानांतर्गत आकर्षक चित्रे काढलेली आहेत, ती शहर सुशोभिकरणामध्ये काढलेली चित्रे विद्यार्थ्यांना दाखवण्यात आली व त्यावर चर्चा घडवून आणण्यात आली. या उपक्रमात काही ठिकाणी शिक्षक, विद्यार्थ्यांसह पालक व शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्यही उपस्थित होते.
प्रत्येक चित्र हे हजार शब्दांचे काम करते. चित्राच्या माध्यमातून पर्यावरण संवर्धनविषयी जागृती प्रभावीपणे होऊ शकते याची प्रचिती विद्यार्थ्यांना आली. चित्रकला उपक्रम पार पडल्यानंतर शाळांमध्ये पर्यावरण विषयक शपथ घेण्यात आली.
प्लास्टिक बंदी, पाण्याचा आवश्यकतेइतकाच वापर करणे, घरातील सुक्या कचऱ्याचा पुनर्वापर करणे याबाबतही उपस्थित ज्येष्ठ नागरिकांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. वसुंधरेचे रक्षण हे आपल्या भविष्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे याची प्रचिती विद्यार्थ्यांनी स्वतः चित्रे रेखाटून प्रदर्शित करीत वसुंधरा अभियानातील हा उपक्रम यशस्वी केला.