सौर ऊर्जा प्रकल्पाची दलित आदिवासी जमिनीत बळजबरी उभारणी केल्यास तीव्र आंदोलन छेडू – अॅड. भास्कर मगरे
अंबड । प्रतिनिधी – राज्य शासनाकडून सध्या सौर ऊर्जा प्रकल्प राबविण्याचे धोरण आहे, या सौर ऊर्जा प्रकल्पासाठी दलित आदिवासींची जमिनी बळकावून त्यावर उभारणी केल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा ईशारा शिवसेना दलित आघाडीचे अॅड. भास्कर मगरे यांनी दिला आहे. ते सोमवार (दि 21) रोजी आयोजित अंबड-घनसावंगी तालुकास्तरीय दलित आदिवासी कार्यकर्ता मेळाव्यात बोलत होते.
यावेळी अण्णासाहेब बाळराज, विलासराव खरात आदींची प्रमुख उपस्थिती होती.
पुढे बोलतांना अॅड. मगरे म्हणाले की, शिवसेना दलित आघाडी गेले अनेक वर्षांपासून दलित आदीवासी कास्तपट्टेनावावर करण्यासाठी आंदोलनाच्या माध्यमातून रस्त्यावरचा संघर्ष करीत आहोत. महाराष्ट्र शासनाचा उर्जा प्रकल्प उभारणी सध्या सुरु आहे. शासनाचे धोरण पडीत व खडकाळ जमिनीवर सौर उर्जा प्रकल्प राबविण्याचे धोरण आहे, मात्र, प्रशासकीय स्तरावर दलित आदिवासी वहिती मशागत केलेल्या उभे पिकांत सौर उर्जा प्रकल्पाची उभारणी करीत आहेत. यास शिवसेना दलित आघाडीचा तीव्र विरोध असल्याचे अॅड. मगरे म्हणाले. गेल्या महिनाभरापासून जालना जिल्ह्यात शिवसेना दलित आघाडीच्यातवीने जनजागृती करण्याचे काम सुरु आहे. पोलीसांमार्फत प्रशासन दलित आदिवासी कास्तकरांना धमकावण्याचे काम करीत आहे. मात्र, त्याला आम्ही घाबरत नाही. वेळप्रसंगी सरकारच्या विरोधात जाऊन आंदोलन करण्याची भूमिका आपली असल्याचेही अॅड. मगरे यांनी यावेळी स्पष्ट केले. यावेळी मोठ्या संख्येने दलित आदिवासींची उपस्थिती होती.