सांगली, प्रतिनिधी : कौटुंबिक समस्यांवर चर्चा करण्यासाठी आणि त्यावर तोडगा काढण्यासाठी कौटुंबिक न्यायालय महत्त्वाचे असल्याचे प्रतिपादन जिल्हा कौटुंबिक न्यायालय सांगलीच्या न्यायाधीश संजश्री घरत यांनी केले. जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, सांगली यांच्या वतीने आयोजित कौटुंबिक न्यायालय कायदा कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून त्या बोलत होत्या. विधी सेवा प्राधिकरण, सांगली येथील वैकल्पिक वाद निवारण केंद्र सभागृहात झालेल्या या कार्यक्रमास जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव गि. ग. कांबळे, कौटुंबिक न्यायालय मुंबईचे समुपदेशक जगन्नाथ कांबळे, समुपदेशक ज्योती बावले-भालकर, कौटुंबिक न्यायालय सांगलीचे प्र. प्रबंधक व्ही. ए. कुलकर्णी, वकील संघटनेचे अध्यक्ष अशोक वाघमोडे आदि उपस्थित होते.
न्यायाधीश संजश्री घरत म्हणाल्या, कौटुंबिक न्यायालय कायद्यानुसार, कौटुंबिक वाद सोडवण्यासाठी समुपदेशन आणि मध्यस्थी या प्रकियांचा अवलंब केला जातो. समुपदेशनात, प्रशिक्षित समुपदेशक कुटुंबातील सदस्यांना त्यांच्या समस्यांवर चर्चा करण्यास आणि त्यावर तोडगा काढण्यास मदत करतात. मध्यस्थीमध्ये तटस्थ व्यक्ती दोन्ही पक्षांना एकत्र आणून त्यांच्यातील वाद मिटवण्यासाठी प्रयत्न करते. समुपदेशन वैयक्तिक किंवा कौटुंबिक समस्यांवर चर्चा करण्यासाठी आणि त्यावर तोडगा काढण्यासाठी मार्गदर्शन केले जाते, असे त्या म्हणाल्या.
कौटुंबिक न्यायालयाचा कायदा व प्रकिया याचे महत्व सांगताना समुपदेशक जगन्नाथ कांबळे म्हणाले, कौटुंबिक न्यायालय कायदा, 1984 हा विवाह आणि कौटुंबिक प्रकरणांशी संबंधित वादांवर जलद आणि प्रभावी तोडगा काढण्यासाठी आहे. या कायद्यानुसार, कौटुंबिक न्यायालये स्थापन केली जातात, ज्यामध्ये विवाह, घटस्फोट, पोटगी, मुलांचा ताबा आणि इतर कौटुंबिक प्रकरणांशी संबंधित वाद कसे हाताळले जातात हे सांगितले.