अभिजात मराठी भाषेचा गौरव वाढविण्यासाठी दैनंदिन व्यवहारात मराठी भाषेचा कटाक्षाने वापर करण्याचे साहित्यिक डॉ.महेश केळुसकर यांचे आवाहन
नवी मुंबई प्रतिनिधी- मराठी भाषेला 2 हजार वर्षांपासूनचा इतिहास असून अभिजात भाषा म्हणून त्यावर केंद्र सरकारचे शिक्कामोर्तब झाले याचा मराठी भाषिक म्हणून अभिमान बाळगत असताना दैनंदिन व्यवहारात मराठी भाषेचा कटाक्षाने वापर केला पाहिजे असे मत साहित्यिक कवी डॉ.महेश केळुसकर यांनी व्यक्त करीत मराठी भाषेची महती विविध उदाहरणे देत उलगडली.
नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली 14 ते 28 जानेवारी या कालावधीत राबविण्यात येत असलेल्या मराठी भाषा संवर्धन पंधरवडा अंतर्गत ‘मायबोली अभिजात मराठी’ विषयावरील व्याख्यानातून डॉ.महेश केळुसकर यांनी मराठीचा जागर केला.
भाषेचे प्रमुख कार्य हे संदेशवहन असून आपल्या बोलण्याचा अर्थ ऐकणाऱ्याला कळावा याकरिता कोणत्याही भाषेची प्रमाण भाषा महत्वाची असते हे सांगत मराठीच्या 68 बोलीभाषा हया तिच्या रक्तवाहिन्या असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. महाराष्ट्रात मराठी भवन असावे व त्यामध्ये बोलीभाषांचे प्राधिकरण स्थापन व्हावे तसेच याव्दारे मराठी भाषेला समृध्द करणाऱ्या बोलीभाषांचा अभ्यास व्हावा यासाठी प्रयत्न सुरु असल्याचे त्यांनी सांगितले. मराठी भाषा विषयक काम करणारी शासनाची सर्व कार्यालये एकाच छताखाली असतील तर परस्पर समन्वय राहून भाषेच्या विकासाला अधिक गती मिळेल असेही ते म्हणाले.
मातृभाषेतून प्राथमिक शिक्षण हे सर्वांगीण विकासासाठी महत्वाचे असते असे जगभरचे शिक्षणतज्ज्ञ सांगतात. त्या अनुषंगाने सुरुवातीपासूनच मराठीतून शिक्षण अंगीकारले पाहिजे असे मत त्यांनी व्यक्त केले. सध्याचा काळ हा प्रसिध्द व्यक्तींचे अनुकरण करण्याचा काळ असून विविध क्षेत्रात प्रसिध्द मराठी व्यक्तींनी मराठी बोलण्याचा आग्रह धरला पाहिजे जेणेकरुन त्यांचे अनुकरण मराठी चाहते करतील असा वेगळा विचार त्यांनी मांडला.
72 देशांमध्ये मराठी बोलली जाते, 15 विदयापीठांमध्ये शिकवली जाते व 12 कोटीहून अधिक लोक मराठीत बोलतात. त्यामुळे मराठी संपली अशी ठोकली जाणारी बोंब अनाठायी असल्याचे सांगत डॉ.महेश केळुसकर यांनी मराठी भाषेची तुलना नवजात अर्भकाला निकोप वाढीसाठी आवश्यक असलेल्या आईच्या दूधाशी केली.
मराठी भाषेचे महत्व सांगताना त्यांनी साहित्यिक वि.स.खांडेकर, कुसुमाग्रज, विंदा करंदीकर, डॉ.भालचंद्र नेमाडे या चार ज्ञानपीठ पुरस्कारप्राप्त मराठी साहित्यिकांची महती सांगितली तसेच कविश्रेष्ठ कुसुमाग्रजांची ‘चंद्र’ व विंदा करंदीकरांची ‘धोंडया न्हावी’ या कविता सादर केल्या. ‘झिनझिनाट’ या स्वत:च्या गाजलेल्या कवितेने त्यांनी व्याख्यानाची सांगता केली.
नवी मुंबई महानगरपालिका भाषा विकासासाठी शासकीय सोपस्कार म्हणून कार्यक्रम न करता आत्मियतेने कार्यक्रम आयोजित करीत असल्याचे कौतुक करीत डॉ.महेश केळुसकर यांनी मराठी भाषेचे अभिजातपण सिध्द झाल्यानंतर त्याचा लौकिक वाढविणे ही आपली जबाबदारी असून प्रत्येकाने त्यासाठी आपल्या परीने संपूर्ण योगदान दयावे असे आवाहन केले. नवी मुंबई महानगरपालिका विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून मराठी भाषेचे महत्व प्रसारीत करीत असून त्यांना चांगला प्रतिसादही मिळत आहे असे सांगत अतिरिक्त आयुक्त श्री.सुनिल पवार यांनी मराठी भाषेच्या विकासासाठी नवी मुंबई महानगरपालिका कटिबध्द असल्याचे मत व्यक्त केले. याप्रसंगी प्रशासन विभागाचे उपआयुक्त श्री.शरद पवार, महापालिका सचिव श्रीम.चित्रा बाविस्कर, कार्यकारी अभियंता श्री.प्रवीण गाडे व अधिकारी, कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते. नवी मुंबई महानगरपालिका अधिकारी, कर्मचारीवृंदासाठी मराठीतील चरित्र –आत्मचरित्र अभिवाचन स्पर्धा सकाळी 11.00 वा. संपन्न होणार