हिवताप / डेंग्यू विषयक जनजागृती शिबिरांचे ‘सफाई अपनाओ – बिमारी भगाओ’ अभियान कालावधीत प्रभावी आयोजन
आरोग्य प्रतिनिधी-‘हिवताप / डेंग्यू यासारखे रोग पसरविणाऱ्या डासांची उत्पत्ती मुख्यत्वे घरांतर्गत व घराभोवताली असलेल्या स्वच्छ साचलेल्या पाण्यामधील डास उत्पत्ती स्थानांमध्ये होत असते. याकरिता अशी स्थाने निर्माण होऊ न देणे अत्यंत गरजेचे आहे. याकरिता नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी व याकामी त्यांना सक्रीय सहभागी करून घेण्याच्या उद्देशाने महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली विविध विभागांमध्ये जनजागृती शिबीरांचे आयोजन करण्यात येत असते.
अशाच प्रकारची शिबिरे ‘सफाई अपनाओ- बिमारी भगाओ’ या एक महिना कालावधीच्या विशेष अभियानाच्या सांगता दिनी 31 जुलै रोजी 26 नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या कार्यक्षेत्रात प्रत्येकी एक अशाप्रकारे 26 ठिकाणी आयोजित करण्यात आली होती. यामध्ये हिवताप, डेंग्यू व साथरोग आजारांबाबत जनजागृती करण्यात आली. या शिबीरांच्या ठिकाणी 11259 नागरिकांनी भेट देत प्रात्यक्षिक मॉडेल्सव्दारे डांसनिर्मितीच्या ठिकाणांविषयी जाणून घेतले. तसेच यावेळी 732 नागरिकांचे रक्तनमुने घेण्यात आले. 25 एप्रिलपासून 26 नागरी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या क्षेत्रात 364 इतक्या मोठ्या प्रमाणात अशा प्रकारच्या जनजागृती शिबीरांचे आयोजन करण्यात आले असून या शिबीरांना 1 लाख 46 हजार 124 नागरिकांनी भेट दिली आहे. तसेच यामध्ये एकूण 9331 नागरिकांचे रक्तनमुने तपासणीसाठी घेण्यात आले. या शिबिरांच्या ठिकाणी उपस्थित नागरिकांना ॲनॉफीलीस व एडीस डासांची उत्पत्तीस्थाने तसेच डासांच्या आळ्या प्रत्यक्ष दाखविण्यात आल्या. त्यासोबतच घराभोवती व घरांतर्गत असणारी डासोत्पत्ती स्थाने , ज्यामध्ये पाणी साठवून ठेवलेले ड्रम हे ओढणी, धोतर किंवा साडीच्या कपड्याने बंदिस्त करणे, त्याचप्रमाणे पाणी साठविण्याची भांडी व टाक्या बंदिस्त करणे व आठवड्यातून एक दिवस त्या स्वच्छ करुन कोरड्या करून ठेवणे, भंगार साहित्य – टायर्स इ. नष्ट करणे तसेच छतावरील प्लास्टीक शिट, ताडपत्री यामध्ये पाणी साचू देवू नये याविषयी मार्गदर्शन करण्यात आले. ताप येताच त्वरित डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचे असल्याचे सांगत आपल्या व इतरांच्या आरोग्याविषयी जागरूक राहून डास प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याबाबत नागरिकांना प्रोत्साहित करुन आवाहन करण्यात आले.
त्यासोबतच विद्यार्थ्यांना हिवताप, डेंग्यू व साथरोग आजाराबाबत माहिती देऊन त्यांच्यामध्ये व त्यांच्या माध्यमातून पालकांमध्ये याविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी नमुंमपा कार्यक्षेत्रातील महानगरपालिकेच्या व खाजगी शाळांमध्ये 17,683 शालेय विद्यार्थ्यांना याबाबत प्रशिक्षण देण्यात आले आहे. स्वच्छता व आरोग्य या एकमेकांना पूरक गोष्टी असून आहेत, यामुळे आपण आपली वैयक्तिक स्वच्छता, घरातील व घराच्या आजुबाजूचा परिसराची स्वच्छता राखली तर नवी मुंबईत साथरोग, हिवताप व डेंग्यू आजारावर आळा घालणे सहज शक्य होईल हे अधोरेखित करीत स्वच्छताप्रेमी नवी मुंबईकर नागरिकांनी याकामी संपूर्ण सहकार्य करावे असे आवाहन महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांच्या वतीने करण्यात येत आहे. “पाण्याचे साठे नेहमी झाका,हिवताप – डेंग्यूला हमखास रोखा”