
कृत्रिम बुद्धिमत्ता व रोबोटिक्स प्रशिक्षणातून दिव्यांगांचे भवितव्य उज्ज्वल – जिल्हाधिकारी अशोक काकडे
मूकबधीर विद्यार्थ्यांसाठीच्या 15 दिवसीय प्रशिक्षणाची सांगता.- राज्यातील पहिला उपक्रम
सांगली, प्रतिनिधी) : कृत्रिम बुद्धिमत्ता व रोबोटिक्स प्रशिक्षणातून मूकबधीर विद्यार्थी स्वावलंबी होतील. त्यांना रोजगार – स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. दिव्यांगांचे भवितव्य उज्ज्वल करणारा हा उपक्रम आहे. हा उपक्रम टप्प्याटप्प्यात सांगली जिल्ह्यातील उर्वरित 12 मूकबधीर शाळांमध्ये टप्प्याटप्प्याने राबवला जाईल. याचबरोबर एमकेसीएलच्या मदतीने दिव्यांगांना एमएससीआयटी अभ्यासक्रमाचे शिक्षण देण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी आज केले.
सांगली जिल्ह्यातील व राज्यातील पहिल्या अशा मूकबधीर विद्यार्थ्यांना कृत्रिम बुद्धिमत्ता व रोबोटिक्स प्रशिक्षण उपक्रमाच्या सांगता कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. जिल्हाधिकारी कार्यालय सांगली आणि वर्शिप अर्थ फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने कै. रा. हि. भिडे मूकबधीर शाळा, मिरज येथे आयोजित या कार्यक्रमास जिल्हाधिकारी यांच्या सुविद्य पत्नी शरदिनी काकडे, तहसीलदार डॉ. अपर्णा मोरे – धुमाळ, जिल्हा दिव्यांग कल्याण अधिकारी भारत निकम, संस्थेचे सचिव सुरेश आवटी, सहसचिव निरंजन आवटी, वुई फाऊंडेशनचे दिनेश कदम, एमकेसीएल परिमल पाटील, दिव्यांग सक्षमीकरण कार्यालयाच्या सहाय्यक सल्लागार मंजिरी माने, शाळेच्या मुख्याध्यापिका श्रध्दा जोशी आदि उपस्थित होते.



