भाकरीवाले पाटील महिला स्वयंसहाय्यता समूहाची यशस्वी वाटचाल
रायगड प्रतिनिधी
ग्रामीण महिलांच्या जिद्दी, एकजुटी आणि कष्टातून उभी राहिलेली यशाची प्रेरणादायी कहाणी म्हणजे भाकरीवाले पाटील महिला स्वयंसहाय्यता समूह. अलिबाग तालुक्यातील वेश्वी येथील या समूहाने घरगुती व्यवसायातून सुरुवात करत आज यशस्वी हॉटेल व्यवसाय उभारून एक आदर्श निर्माण केला आहे.
सन 19 ऑक्टोबर 2018 रोजी स्थापन झालेल्या या समूहाच्या उद्योजिका सौ. वैभवी चंद्रकांत राऊळ यांच्या नेतृत्वाखाली महिलांनी आपल्या कष्टाच्या जोरावर व्यवसायाला नवी दिशा दिली. सुरुवातीला अलिबाग परिसरातील पर्यटन क्षेत्र लक्षात घेऊन हॉटेलांना भाकरी पुरवण्याचा व्यवसाय सुरू करण्यात आला. मागील अनेक वर्षांपासून महिलांकडून चालत आलेल्या या पारंपरिक व्यवसायाला त्यांनी संघटित रूप दिले.
अलिबाग, नागाव, काशीद, मुरुड या पर्यटन स्थळांवर मोठ्या प्रमाणात पर्यटक येत असल्याने हॉटेल व्यवसायाला चांगली मागणी होती. या संधीचा लाभ घेत महिलांनी भाकरी पुरवठा व्यवसाय विस्तारला. त्यानंतर त्यांनी घरगुती होमस्टे सुरू केला, ज्याला ग्राहकांकडून उत्तम प्रतिसाद मिळाला. अस्सल घरगुती चव आणि महिलांच्या हातची खासियत यामुळे ग्राहकांची पसंती मिळत गेली.
या यशाच्या जोरावर जानेवारी 2023 मध्ये सहान बायपास रोड, अलिबाग येथे “भाकरीवाले पाटील लंच होम” या नावाने पहिली शाखा सुरू करण्यात आली. अल्पावधीतच या हॉटेलला मोठा प्रतिसाद मिळाला. वाढत्या मागणीमुळे 15 ऑगस्ट 2023 रोजी अलिबाग शहरात कलेक्टर कार्यालयासमोर हिराकोट तलावाजवळ दुसरी शाखा सुरू करण्यात आली.
उमेद अभियानात सहभागी झाल्यानंतर समूहाच्या कार्याला अधिक बळ मिळाले. महिलांनी एकत्र येऊन मोठ्या बाजारपेठेत प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. यामुळे त्यांच्या आत्मविश्वासात लक्षणीय वाढ झाली आणि व्यवसायातही विस्तार झाला. तालुका, जिल्हा व राज्य स्तरावरील उमेद अभियान व्यवस्थापन कक्षाकडून वेळोवेळी मिळालेल्या मार्गदर्शनामुळे समूहाने राज्य व देश पातळीवर आपली ओळख निर्माण केली.
समूहाला महालक्ष्मी सरस 2023-24 मध्ये देशभरातील समूहांमध्ये सर्वाधिक विक्री केल्याबद्दल गौरविण्यात आले, तसेच “सावित्री रत्न पुरस्कार 2024” नेही सन्मानित करण्यात आले आहे.
आर्थिक बळकटीसाठी समूहाने सुरुवातीला बँक ऑफ इंडिया, अलिबाग शाखेकडून ३ लाख रुपयांचे कर्ज घेतले व त्याची वेळेत परतफेड केली. त्यानंतर त्यांना 6 लाख रुपयांचे अर्थसहाय्य प्राप्त झाले. बँकेकडून तसेच लीड डिस्ट्रिक्ट मॅनेजर विजयकुमार कुलकर्णी यांचे मार्गदर्शनही लाभले.
उमेद अभियानांतर्गत फिरता निधी, समूह कर्ज व ग्रामसंघामार्फत विविध आर्थिक सहाय्य मिळाल्यामुळे व्यवसाय वृद्धीस चालना मिळाली. बँकिंग प्रणालीच्या मदतीने महिलांनी स्वतःचा व्यवसाय अधिक सक्षम केला.आज या समूहाच्या यशामुळे महाराष्ट्रातील विविध भागांतून शाखा सुरू करण्यासाठी प्रस्ताव येत असून, अनेक महिला उद्योजकांनी त्यांच्या व्यवसाय मॉडेलमध्ये रस दाखवला आहे. भविष्यात महाराष्ट्रासह देशभर आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरही आपल्या अस्सल चवीचा विस्तार करण्याचा त्यांचा मानस आहे.