vishwatmaklokswamivarta
Breaking News
करमणुक

कानडा राजा पंढरीचा’मधून आषाढी एकादशीनिमित्त विठ्ठलभक्तीचा सुरेल जागर सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे २५ जुलै रोजी मुंबईत विशेष सांगीतिक कार्यक्रमाचे आयोजन

कानडा राजा पंढरीचा’मधून आषाढी एकादशीनिमित्त विठ्ठलभक्तीचा सुरेल जागर सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे २५ जुलै रोजी मुंबईत विशेष सांगीतिक कार्यक्रमाचे आयोजन

            मुंबई, प्रतिनिधी  : सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्यावतीने आषाढी एकादशीनिमित्त ‘कानडा राजा पंढरीचा’ या विशेष सांगीतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवार, दि. २५ जुलै २०२६ रोजी सायंकाळी ६.०० वाजता रंगशारदा, वांद्रे (पश्चिम), मुंबई येथे हा कार्यक्रम सादर होणार आहे.

    ‘कानडा राजा पंढरीचा’ हा महाराष्ट्राच्या समृद्ध भक्तीपरंपरेचा आणि वारकरी संप्रदायाच्या सांस्कृतिक वारशाचा सुरेल आविष्कार आहे. विठ्ठलभक्ती, संतपरंपरा आणि अभंगसंगीत यांच्या माध्यमातून रसिकांना भक्तिरसपूर्ण सांगीतिक अनुभव देण्याचा प्रयत्न या कार्यक्रमातून करण्यात आला आहे. आषाढी एकादशीच्या निमित्ताने विठ्ठलनामाच्या भक्तीभावात रसिकांना चिंब करणारा हा विशेष सांगीतिक सोहळा ठरणार आहे.

            या कार्यक्रमात प्रसिद्ध गायक प्रथमेश लघाटे आणि मुग्धा वैशंपायन यांच्या सुमधुर आवाजातून भक्तिगीते, अभंग आणि विठ्ठलभक्तीपर रचनांचे सादरीकरण करण्यात येणार आहे. संगीत संयोजन निरंजन लेले यांचे असून, कार्यक्रमाचे निवेदन मिलिंद कुलकर्णी करणार आहेत. सचिन सावंत, अथर्व आठल्ये, संतोष दिवेकर, अमित गोठीवरेकर आणि संदीप कुलकर्णी हे वादक कलाकार कार्यक्रमात साथसंगत करणार आहेत.

            महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि आध्यात्मिक जीवनात आषाढी एकादशी, तसेच पंढरपूरची वारी यांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम आणि संतपरंपरेतील संतांच्या अभंगवाणीने महाराष्ट्राच्या भक्तीपरंपरेला समृद्ध केले आहे. या समृद्ध भक्तीपरंपरेचा आणि सांस्कृतिक वारशाचा परिचय नव्या पिढीला करून देण्याच्या उद्देशाने ‘कानडा राजा पंढरीचा’ या विशेष सांगीतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

  हा सांस्कृतिक उपक्रम सांस्कृतिक कार्य, इलेक्ट्रॉनिक्स, माहिती तंत्रज्ञान व कृत्रिम बुद्धिमत्ता मंत्री ॲड. आशिष शेलार यांच्या संकल्पनेतून आणि सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला आहे. महाराष्ट्राच्या समृद्ध सांस्कृतिक परंपरेचे जतन, संवर्धन आणि प्रसार करण्याबरोबरच भक्तिसंगीत, संतपरंपरा आणि सांस्कृतिक वारसा अधिकाधिक रसिकांपर्यंत पोहोचावा, या उद्देशाने सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे सातत्याने आयोजन करण्यात येत आहे.

   या कार्यक्रमास प्रवेश विनामूल्य असून, मुंबई व परिसरातील विठ्ठलभक्त, वारकरी, संगीतप्रेमी, कला रसिक तसेच नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या भक्तिरसपूर्ण सांगीतिक अनुभवाचा लाभ घ्यावा, असे आवाहन सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक श्रीराम पांडे यांनी केले आहे.

0000

संजय ओरके/विसंअ

 

 

संबंधित पोस्ट

वेव्हज मध्ये भारताला सर्जनशील आशय सामग्रीमध्ये जगाचे नेतृत्व करण्याची संधी गवसेल” अभिनेते अल्लू अर्जुन यांनी व्यक्त केला विश्वास…

अभिनय जितके प्रामाणिकपणे कराल,तितके ते उत्तम होईल– अभिनेता आमिर खान

७२ वे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार जाहीर; ‘मुक्काम पोस्ट बोंबिलवाडी’ सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट कार्तिक आर्यन आणि मामुट्टी सर्वोत्कृष्ट अभिनेता तर यामी गौतम सर्वोत्कृष्ट अभिनेत्री, आर्टिकल ३७० सर्वोत्कृष्ट चित्रपट

भारतीय चित्रपटसृष्टीतील ‘ऑस्कर’ अकॅडमी पुरस्काराने गौरविलेल्या प्रख्यात वेशभूषाकार भानू अथैय्या यांच्या जीवनकार्याला अभिवादन करण्यासाठी ‘भानू अथैय्या : साधनेतून सन्मानाकडे’ या विशेष सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन

दा. कृ. सोमण यांचा निसर्ग संवर्धनाचा संदेश ‘वन्यजीव-निसर्ग-साहस’ व्याख्यानमाला रंगली

विनविन मार्क्वेझने मिस युनिव्हर्स फिलीपिन्स मुनटिनलुपा 2025 चा ताज जिंकला..

vishwatmaklokswamivarta