
‘डीजे’मुक्त, सुरक्षित,पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठीसर्व घटकांनी समन्वय राखावा-जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी गणेश मंडळांसाठी स्पर्धा उत्कृष्ट मंडळांना तालुका व जिल्हास्तरावर पुरस्कार…
छत्रपती संभाजीनगर, प्रतिनिधी)- यंदाचा गणेशोत्सव ‘डीजे’ मुक्त, सुरक्षित व पर्यावरणपूरक करण्यावर भर द्यावयाचा आहे. त्यासाठी जिल्हा प्रशासन, पोलीस, स्थानिक स्वराज्य संस्था, सार्वजनिक गणेश मंडळे आणि नागरिक अशा सर्व घटकांचा समन्वय राखावा, असे निर्देश जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी आज दिले.
यंदा उत्कृष्ट गणेश मंडळांसाठी राज्य शासनाने स्पर्धाही आयोजीत केल्या असून तालुका, जिल्हा पातळीवर पुरस्कार देण्यात येणार आहेत. त्यातही गणेश मंडळांनी सहभागी व्हावे असे आवाहनही जिल्हाधिकारी गौडा यांनी केले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन सभागृहात आज सार्वजनिक गणेशोत्सवाच्या अनुषंगाने सर्व शासकीय विभागांची समन्वय बैठक आज पार पडली.
जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिन्नू पी. एम., जिल्हा पोलीस अधीक्षक प्रकाश जाधव, अपर जिल्हाधिकारी संभाजी अडकुणे, निवासी उपजिल्हाधिकारी जनार्धन विधाते तसेच सर्व उपविभागीय अधिकारी, उपविभागीय पोलीस अधिकारी, नगरपालिका मुख्याधिकारी व सर्व संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते. क्षेत्रीय अधिकारी दूरदृश्यप्रणालीद्वारे बैठकीत सहभागी झाले होते.
डीजे’मुक्त साठी पुढाकार घ्यावा,गणेशोत्सव कालावधीत ध्वनीप्रदुषण रोखण्यासाठी तसेच पावित्र्य राखण्यासाठी सार्वजनिक गणेश मंडळांनी ‘डीजे’चा वापर टाळून पारंपरिक वाद्यांना प्राधान्य द्यावे. गणेश मंडळांशी प्रशासनाने संवाद ठेवून आवश्यक सूचना व मार्गदर्शन करावे, असे जिल्हाधिकारी विनय गौडा जी. सी यांनी सांगितले
उत्कृष्ट गणेश मंडळांना पुरस्कार सामाजिक उपक्रम, पर्यावरणपूरकता, स्वच्छता आणि सुरक्षिततेला प्रोत्साहन देण्यासाठी उत्कृष्ट सार्वजनिक गणेश मंडळांना तालुका व जिल्हास्तरावर पुरस्कार देण्यात येणार आहेत. तालुकास्तरावर प्रथम क्रमांक प्राप्त करणाऱ्या गणेश मंडळास २५ हजार रुपये, तर जिल्हास्तरावर प्रथम क्रमांकासाठी ५० हजार रुपये, द्वितीय क्रमांकासाठी ४० हजार रुपये आणि तृतीय क्रमांकासाठी ३० हजार रुपये बक्षीस देण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी गौडा यांनी दिली. याबाबत प्रचार करुन अधिकाधिक मंडळांना सहभागी करुन घ्यावे, असे निर्देश जिल्हाधिकारी गौडा यांनी दिले.
तालुकास्तरावर समित्या स्थापन करा, तालुकास्तरावर आवश्यक समित्या स्थापन कराव्यात. या समित्यांनी सार्वजनिक गणेश मंडळांशी समन्वय साधून बैठका घ्याव्यात. पोलीस प्रशासनाच्या सहभागातून मंडळांना सुरक्षा, वाहतूक, पार्किंग व विसर्जन व्यवस्थेबाबत आवश्यक मार्गदर्शन करावे, असे निर्देश त्यांनी दिले
अग्निशमन, सुरक्षा व्यवस्था, स्वच्छता आवश्यक,सार्वजनिक गणेश मंडळांनी मंडप उभारणीपासून विसर्जनापर्यंत सुरक्षिततेच्या सर्व निकषांचे काटेकोर पालन करावे. मंडपाच्या ठिकाणी अग्निप्रतिबंधक उपाययोजना, सुरक्षित विद्युत व्यवस्था, आपत्कालीन व्यवस्थापन, स्वच्छता व आरोग्यविषयक सुविधा उपलब्ध असाव्यात. गर्दीच्या ठिकाणी वाहतुकीची कोंडी होणार नाही यासाठी वाहतूक नियमन व पार्कींगचे आगाऊ नियोजन करावे
आगमन-विसर्जन मिरवणूक मार्ग निश्चित करा आगमन व विसर्जन मिरवणुकी दरम्यान आवश्यक पोलीस बंदोबस्त ठेवावा. मिरवणूक मार्ग, गर्दीची संभाव्य ठिकाणे, पार्कींगची ठिकाणे, पर्यायी वाहतूक मार्ग निश्चित करून सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे, असे जिल्हाधिकारी गौडा यांनी सांगितले. विसर्जनस्थळी सुरक्षा,प्रकाश व्यवस्था, वैद्यकीय पथके, रुग्णवाहिका इ. सज्ज ठेवावीत. विसर्जनानंतर तातडीने स्वच्छता मोहीम राबवावी. जलप्रदूषण टाळण्यासाठी जनजागृती करावी. पर्यावरणपूरक गणेशमूर्ती व नैसर्गिक साहित्याच्या वापराला प्रोत्साहन द्यावे, असेही त्यांनी सांगितले.
गणेश मंडळांची संपर्क यादी अद्ययावत कराजिल्ह्यातील सर्व सार्वजनिक गणेश मंडळांची संपर्क यादी अद्यावत ठेवावी. महसूल, पोलीस व स्थानिक स्वराज्य संस्थांनी मंडळांशी नियमित संपर्क ठेवावा. तालुकास्तरावर मंडळांच्या बैठका घेऊन त्यांना सर्व व्यवस्थेबाबत आवश्यक सूचना द्याव्या.
भेसळमुक्त प्रसाद,अन्न व औषध प्रशासनाने मंडळांतर्फे वाटप होत असलेला प्रसाद तसेच या कालावधीत बाजारात प्रसादासाठी म्हणून विक्री होत असलेल्या मिठाईची विशेष तपासणी करावी. प्रसाद वाटपासाठी मंडळांनी परवाना घेणे आवश्यक आहे. त्यासाठी मंडळांना सहकार्य करावे. खाद्यपदार्थांची गुणवत्ता तपासून भेसळयुक्त पदार्थांची विक्री व प्रसाद म्हणून वाटप होणार नाही, याची खबरदारी घ्यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी गौडा यांनी दिले.
प्रतिबंधात्मक कारवाईची प्रकरणे निकाली काढा- पोलीस अधीक्षक जाधव जिल्हा पोलीस अधीक्षक प्रकाश जाधव यांनी विसर्जनाच्या दृष्टीने महत्त्वाच्या ठिकाणांवरील व्यवस्थेबाबत सूचना दिल्या. गंगापूर तालुक्यातील कायगाव टोका परिसरातील विसर्जनस्थळी भाविकांची गर्दी लक्षात घेऊन पुरेशी प्रकाश व्यवस्था व आवश्यक सुरक्षा उपाययोजना कराव्यात. स्थानिक यंत्रणांनी या ठिकाणी विशेष लक्ष देऊन विसर्जन प्रक्रिया सुरक्षित व सुरळीत पार पडेल यासाठी आवश्यक नियोजन करावे, असे त्यांनी सांगितले. तसेच याकालावधीत समाजकंटकांवरील प्रतिबंधात्मक कारवाईची प्रकरणे तातडीने निकाली काढावीत.
०००००



