
अनिल देशमुखांना बोगस केसमध्ये अडकवलं, हा राजकीय डाव उलटवून लावू; नवाब मलिक राष्ट्रवादीचे प्रवक्ते
मुंबईः प्रतिनिधी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना एका बोगस केसमध्ये अडकवलं आहे. हा राजकीय डाव आम्ही उलटवून लावू, असा दावा गुरुवारी नवाब मलिका यांनी केला. मलिक यांनी यावेळी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्याविरोधातही मोर्चा उघडला. वानखेडेंनी एका अधिकाऱ्याच्या मुलाला ड्रग्जच्या बोगस केसमध्ये अडकवलं. त्याविरोधात बोलू नये म्हणून दबाव टाकण्यात येतोय, असा दावा त्यांनी केला. सोबतच त्यांच्याविरोधात महापालिका आणि शाळेचे दस्तावेज कोर्टात दिल्याचंही सांगितलं. मलिकांचे आरोप आणि दावे पाहता येणाऱ्या काळात वानखेडे यांच्याकडून यावर कोणी बोलणार का, की ते स्वतः मीडियात आपली बाजू मांडणार याची उत्सुकता आहे.
नवाब मलिक पुढे म्हणाले की, मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंग फरार आहेत. विशेष म्हणजे तेच तक्रारदार आहेत. त्यामुळं माजी मंत्री अनिल देशमुख यांना अडकवण्याचा हा राजकीय डाव आहे, पण हा डाव आम्ही उलटवून लावू. तक्रारदार फरार आहेत, तर चौकशी कशी होणार, असा सवालही त्यांनी केला. अनिल बोंडे एका क्लाऊडवर बोलत होते. त्यात त्यांनी काही विधान केलं आहे. दंगलीसंदर्भातला जो ऑडियो आहे, तो मी ट्विट केला आहे, अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली.
नवाब मलिकांनी आजही आक्रमक भूमिका घेतली. पत्रकारांशी बोलतना ते म्हणाले की, एका अधिकाऱ्याच्या मुलालाही मुद्दाम बोगस केसमध्ये अडकवण्यात आलं आहे. त्यांच्या मुलाला एका गुन्ह्यात आरोपी बनवण्यात आलं. जे आधी लग्न झालं होतं, त्या महिलेला आता धमकावण्यात येत आहे. त्या महिलेच्या कुटुंबातील एका मुलाला ड्रग प्रकरणात पकडण्यात आलंय. त्यांनी विरोधात बोलू नये यासाठी दबाव टाकला जातोय, असा घणाघाती आरोपही त्यांनी यावेळी केली.
मलिक यांनी यापूर्वी समीर वानखेडे यांच्या धर्मावर प्रश्न उपस्थित केले होते. ते त्यांचा उल्लेख नेहमीच समीर दाऊद वानखेडे असा करतात. आजच्या पत्रकार परिषदेतही त्यांनी याबाबत विविध प्रश्न उपस्थित करत माहिती दिली. मलिक म्हणाले की, वानखेडे यांच्या वडिलांनी माझ्याविरोधात केस टाकली आहे. त्यात आम्ही काही अतिरिक्त कागदपत्रे दिली आहेत. त्यात शाळा सोडल्याचा दाखला देण्यात आला आहे. आम्ही पालिकेकडून आणि शाळेकडून मिळालेले दस्तावेज कोर्टात दाखल केले आहेत.



