
महाराष्ट्र राज्यातील मुंबईत मुद्रांक शुल्क सवलत रद्द होताच घरखरेदीही मंदावली…..
मुंबई : प्रतिनिधी गृहनिर्माण क्षेत्राला चालना देण्यासाठी राज्य सरकारने मुद्रांक शुल्कामध्ये सवलत दिल्याने गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात मुंबईत (MUMBAI)घरांची मोठ्या प्रमाणात विक्री झाली होती; परंतु ही सवलत रद्द होताच घर खरेदीचा उत्साह कमी झाला असून, मुंबईत आजपर्यंत केवळ पाच हजार ४७५ घरांचीच विक्रीची नोंदवली गेली आहे. गेल्या वर्षीच्या डिसेंबर महिन्यात १९ हजार ५८१ घरांची नोंद झाली होती. त्या तुलनेत यंदाच्या डिसेंबर महिन्यात घर खरेदीला कमी प्रतिसाद मिळाल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे.
कोरोनाच्या(CORONA) पार्श्वभूमीवर लागू केलेल्या टाळेबंदीमुळे सर्व क्षेत्रावर विपरित परिणाम झाला. गृहनिर्माण क्षेत्रही यातून सुटले नाही. या क्षेत्राला गती देण्यासाठी राज्य सरकारने सप्टेंबर ते डिसेंबर २०२० पर्यंत मुद्रांक शुल्कात ३ टक्क्यांची सूट दिली. या कालावधीत राज्यात मोठ्या प्रमाणात घर खरेदी झाली. त्यामुळे विकसकांनी मुदत संपुष्टात येताच सवलतीला मुदतवाढ देण्याची मागणी लावून धरली. त्यामुळे राज्य सरकारने १ जानेवारी २०२१ ते ३१ मार्च २०२१पर्यंत मुद्रांक शुल्काचा ३ टक्के दर कायम ठेवला. या कालावधीतही मुंबईत नागरिकांनी मोठ्या प्रमाणात घर खरेदी केली; परंतु ही मुदत संपताच घर खरेदीचा प्रतिसाद रोडावल्याचे समोर आले आहे.गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा डिसेंबर महिन्यात घर खरेदी मंदावली आहे. गेल्या वर्षी मुंबईत १९ हजार ५८१ घरांची नोंदणी मुद्रांक शुल्क विभागाकडे झाली होती. तर यंदा डिसेंबरमध्ये आतापर्यंत ५ हजार ४७५ घरांची विक्री झाली असल्याचे मुद्रांक व नोंदणी शुल्क विभागाच्या आकडेवारीतून समोर येत आहे. मुद्रांक शुल्काची सवलत रद्द केल्याने घर खरेदीकडे ग्राहकांनी पाठ फिरवल्याचे विकसकांकडून बोलले जात आहे.



