
हॉटेल व्यवसाय हंगामावर चालतो. त्या हंगामातच आणि व्यवसाय होणाऱ्या रात्री आठ ते अकरा या वेळेतच निर्बंध असतील, तर हॉटेल उघडण्यापूर्वीच बंद करायचे काय, असा प्रश्न आहे.”– गौरव चांडक, अध्यक्ष, हॉटेल असोसिएशन…
नाशिक प्रतिनिधी: राज्यात ओमिक्रॉन कोरोनाबाधित रुग्णसंख्या वाढत आहे. त्यामुळे रात्री नऊ ते सकाळी सहापर्यंत पुन्हा रात्रीची जमावबंदी लागू झाली आहे. त्यामुळे ३१ डिसेंबर आणि नववर्षाच्या स्वागताला हॉटेल व्यावसायिकांच्या व्यवसायावर परिणाम होणार असून, निर्बंध नऊपासून सुरू होत असल्याने हॉटेल उघडण्यापूर्वीच बंद करायचे काय, असा सवाल उपस्थित करत नवीन निर्बंधांमुळे नैराश्य आल्याचे म्हटले आहे.
राज्यातील वाढत्या कोरोना प्रादुर्भावाचा विचार करून शासनाने संसर्ग रोखण्यासाठी काही निर्बंध लागू केले आहेत. त्यात हॉटेल व्यावसायिकांना ५० टक्के आसन क्षमतेसह परवानगी दिली आहे. हॉटेलचा व्यवसाय पूर्वपदावर येत होता. आता नव्या नियमावलीनुसार हॉटेल रात्री नऊला बंद करावे लागणार असल्यामुळे हॉटेल व्यावसायिकांनी नियमावर हतबलता व्यक्त करीत अशीच परिस्थिती राहिल्यास व्यवसाय बंद करण्याची नामुष्की येईल. हॉटेल व्यावसायिकांची दोन वर्षांपासून हीच परिस्थिती कायम असून, हॉटेलमधील कर्मचाऱ्यांनी लशीचे दोन डोस घेऊनही ही परिस्थिती कायम आहे.
“कोरोनाच्या नव्या नियमावलीमुळे हॉटेल व्यावसायिकांची अवघड परिस्थिती झाली आहे. हॉटेल व्यवसाय हंगामावर चालतो. त्या हंगामातच आणि व्यवसाय होणाऱ्या रात्री आठ ते अकरा या वेळेतच निर्बंध असतील, तर हॉटेल उघडण्यापूर्वीच बंद करायचे काय, असा प्रश्न आहे.”- गौरव चांडक, अध्यक्ष, हॉटेल असोसिएशन



