
घर घर संविधान’ कार्यक्रम लोकचळवळ व्हावी- जिल्हाधिकारी स्वामी
छत्रपती संभाजीनगर, प्रतिनिधी-
घर घर संविधान या अभियानाद्वारे विविध कार्यक्रम राबवून आपल्या संविधानाची महती प्रत्येक घरापर्यंत पोहोचवावयाची आहे. समाजातील सर्व घटकांना या अभियानात सामावून घेऊनघर घर संविधान हा कार्यक्रम लोकचळवळ व्हावा,असे आवाहन जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी आज येथे केले.
‘घर घर संविधान’ या कार्यक्रमासंदर्भात आज जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजीत बैठकीत आढावा बैठक घेण्यात आला. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित, निवासी उपजिल्हाधिकारी विनोद खिरोळकर, उपजिल्हाधिकारी सामान्य प्रशासन संगिता राठोड, सहा.आयुक्त समाज कल्याण प्रदीप भोगले तसेच अन्य अधिकारी उपस्थित होते.
जिल्ह्यात घर घर संविधान या कार्यक्रमांतर्गत संविधानाचे महत्त्व घरोघरी पोहोचवून लोकांना संविधानात दिलेल्या नागरिकांचे हक्क व कर्तव्य याबाबत जागरुक करण्यात यावे. त्यासाठी विविध जनजागृतीपर कार्यक्रमाचे आयोजन करावे. शाळा, महाविद्यालय व ग्रामपंचायतस्तरावर विविध कार्यक्रमाचे आयोजन करावे, असे निर्देश देण्यात आले. संविधानाविषयी जागरुकता, मूल्य संस्कार, सक्रिय सहभाग, राष्ट्रीय एकात्मता, संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन, दर्शनीभागात उद्देशिकेचे प्रदर्शन करणे, संविधान निर्मिती प्रक्रियेबाबत माहिती देणे, याच विषयावर वादविवाद स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, निबंध लेखन अशा विविध उपक्रमातून सर्व वयोगटाच्या व समाज घटकांतील नागरिकांना या उपक्रमांत सहभागी करुन घेऊन घर घर संविधान हा कार्यक्रम लोकचळवळ म्हणून राबवावा,असे निर्देश जिल्हाधिकारी स्वामी यांनी उपस्थितांना दिले.
०००००



