रायगड प्रतिनिधी :-शिवराज्याभिषेक सोहळा कार्यक्रमाचे दुर्गराज रायगड येथे तारखेनुसार 6 जून व तिथीनुसार 09 जून रोजी आयोजन करण्यात येणार आहे. यावर्षी शिवराज्याभिषेक सोहळा साडेतीनशे वर्ष पूर्ण झाल्याने येथील कार्यक्रमाला शिवप्रेमी नागरिकांची लाखोच्या संख्येने उपस्थिती होणार असल्याने या कार्यक्रमांची पूर्वतयारी करताना संबंधित विभागांनी सूक्ष्म नियोजन करावे असे निर्देश विभागीय आयुक्त डॉ.विजय सुर्यवंशी यांनी दिले.रायगड किल्ला येथे शिवराज्याभिषेक सोहळा 2025 च्या अनुषंगाने नियोजन बैठक संपन्न झाली यावेळी विभागीय आयुक्त श्री.सुर्यवंशी बोलत होते.
या बैठकीस जिल्हाधिकारी किशन जावळे, मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले, जिल्हा पोलीस अधीक्षक आचल दलाल, अपर जिल्हाधिकारी सुनिल थोरवे, उप मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यजित बडे, उपजिल्हाधिकारी (सा.प्र.) रविंद्र शेळके, यासह विविध शासकीय विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.जिल्हाधिकारी श्री.सुर्यवंशी म्हणाले शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी राज्यातील विविध जिल्ह्यातून मोठ्या संख्येने शिवप्रेमी नागरिक रायगड येथे येत असतात या वर्षी होणाऱ्या सोहळा कार्यक्रमांसाठी आयोजकांकडून तयारी केली जात आहे. मागील वर्षी सुरक्षा व पायाभूत सुविधांवर मोठा ताण निर्माण झाला होता हा अनुभव लक्षात घेऊन यावर्षी कोणतीही समस्या उद्भवू नये या दृष्टीने आवश्यक त्या सुविधा निर्माण करण्यासाठी पूर्वतयारी केली जावी. येणाऱ्या नागरिकांच्या वाहनांचे पार्किंग,पिण्याचे पाणी, आरोग्य, स्वच्छता तसेच या कालावधीत आवश्यक असणाऱ्या विविध सुविधा उपलब्ध व्हाव्या यासाठी सूक्ष्म नियोजन करून कार्यवाही करावी असे विभागीय आयुक्त डॉ.विजय सुर्यवंशी यांनी सुचित केले. तसेच महाड व माणगाव मार्गे येणाऱ्या खाजगी वाहनांच्या वाहतूक कोंडीचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी रस्त्यांची कामे, पार्किंगच्या जागा व तेथून गडाकडे जाणाऱ्या मार्गाची व्यवस्था संबंधित विभागांनी पूर्ण करावे तसेच आवश्यक ते माहिती देणारे फलक लावले जावेत असे सांगितले. मागील वर्षी झालेला सोहळ्याबाबत केलेली कार्यवाही व यंदाच्या पूर्वतयारी बाबत विविध प्रमुख अधिकाऱ्यांनी माहिती सादर केली.