राष्ट्रीय जनसंपर्कासाठी निघालेल्या भारतीय नौदलाच्या कार रॅलीला नौदल प्रमुखांनी हिरवा झेंडा दाखवून केले रवाना
खेळ प्रतिनिधी-
भारतीय नौदल आणि नागरिक यांच्यातील संबंध वृद्धिंगत करण्याच्या बांधिलकीची वचनबद्धता दर्शवत नौदल प्रमुख ॲडमिरल दिनेश के. त्रिपाठी यांनी आज 13 सप्टेंबर 2025 रोजी नवी दिल्ली इथे भारतीय नौदल कार रॅलीला हिरवा झेंडा दाखवून रवाना केले. उत्तर प्रदेश या सांस्कृतिकदृष्ट्या समृद्ध व धोरणात्मक दृष्ट्या महत्त्वपूर्ण प्रदेशात नौदलाच्या जनसंपर्क उपक्रमाचा हा एक महत्त्वपूर्ण टप्पा ठरला आहे.
फेरीमध्ये एकूण 34 जण सहभागी झाले असून त्यात विद्यमान नौदल कर्मचारी तसेच नौदल कल्याण व आरोग्य संघटनेच्या सदस्यांचा समावेश आहे. रॅलीदरम्यान 8 दिवसांत 1700 किलोमीटरचा प्रवास केला जाणार असून आग्रा, लखनौ, वाराणसी आणि कानपूर या शहरांतून मार्गक्रमण होणार आहे. या शहरांची निवड स्थानिक जनतेशी संवाद वाढवण्यासाठी तसेच प्रदेशाच्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक महत्त्वाचा सन्मान करण्यासाठी करण्यात आली आहे.
रॅलीची पाच प्रमुख उद्दिष्टे;-1. नौदल माजी सैनिक व वीरनारींशी संवाद – कृतज्ञता व्यक्त करून नौदलाच्या कुटुंबीयांप्रती असलेले सातत्यपूर्ण पाठबळ अधोरेखित करणे.
2. मार्गातील स्वयंसेवी संस्थांना सहकार्य – सामाजिक दायित्व व सामुदायिक कल्याणासाठी नौदलाची बांधिलकी दर्शवणे.
3. नौदल जनजागृतीचा प्रसार – युवक व विद्यार्थ्यांमध्ये देशभक्तीची भावना व समुद्री भान जागृत करण्यासाठी जनजागृती उपक्रम राबवणे.
4. नौदल सैनिक पत्नी कल्याण संघटनेच्या (एनडब्ल्यूडब्ल्यूए ) ‘कौशल्य भारत’ योगदानाचे प्रदर्शन – स्थानिक कारागिरांशी समन्वय साधून कौशल्य विकासाद्वारे समाज सशक्तीकरणात एनडब्ल्यूडब्ल्यूएची भूमिका अधोरेखित करणे.
5. भारताच्या सांस्कृतिक वारशाला अभिवादन – महत्त्वाच्या ऐतिहासिक वारसा स्थळांना भेट देऊन देशाच्या ऐतिहासिक कलाकृतींना आदरांजली वाहणे.
ही फेरी राष्ट्रीय एकात्मतेसाठी भारतीय नौदलाच्या वचनबद्धतेचे द्योतक आहे. किनारपट्टीपलीकडे जाऊन नागरिकांशी संपर्क साधण्याचा सक्रिय प्रयत्नांचा पुरावा आहे., नौदल केवळ सागरी शक्ती नसून राष्ट्रीय एकात्मतेचा व अभिमानाचा स्तंभ आहे, हे यातून पुन्हा अधोरेखित होते.