मणिपूरमध्ये आलेल्या पुरामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून अनेक कुटुंबांचे मोठे नुकसान झाले आहे. या आपत्तीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, मणिपूर सेवा समिती आणि सेवा भारती मणिपूर यांनी तातडीने मदतकार्य हाती घेतले आहे. थौबल जिल्ह्यातील स्वयंसेवकांनी हाओखा गावातील सुमारे तीनशे कुटुंबांना तांदूळ, पिण्याचे पाणी, कपडे आणि इतर आवश्यक साहित्य वाटप केले.
पूरग्रस्त भागांत मदत पोहोचवण्यासाठी स्थानिक क्लब, कार्यकर्ते आणि स्वयंसेवक समन्वय साधत आहेत. राज्य सरकारने इंफाळ ईस्ट, इंफाळ वेस्ट, थौबल, बिष्णुपूर आणि ककचिंग जिल्ह्यांतील शाळा-महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली आहे. अनेक शासकीय कार्यालये व बाजारपेठ पाण्याखाली गेल्याने दैनंदिन व्यवहार ठप्प झाले आहेत. काही भागांत वीज व पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे.
राज्य आपत्ती प्रतिसाद दल, लष्कर व असम रायफल्स यांची पथके बचाव व स्थलांतरासाठी तैनात करण्यात आली आहेत. प्रभावित गावांमध्ये मदत शिबिरे सुरू करण्यात आली असून अन्नधान्य, औषधे व स्वच्छ पिण्याचे पाणी पुरवले जात आहे. प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.