आयुष्मान भारत योजना तळागाळापर्यंत पोहोचवा – डॉ. ओमप्रकाश शेटे
सांगली, प्रतिनिधी) : प्रत्येक गरजू व गरीब रुग्णाला उपचार मिळाले पाहिजेत. उपचारासाठी आर्थिक कुवत नसल्यामुळे कुणीही रुग्ण उपचाराविना राहता कामा नये. अशा नागरिकांना आयुष्मान भारत योजना संजीवनी आहे. लोकप्रतिनिधी व प्रशासकीय अधिकाऱ्यांनी परस्पर समन्वयाने ही योजना तळागाळापर्यंत पोहोचवावी, असे आवाहन आयुष्मान भारत मिशन महाराष्ट्र समितीचे प्रमुख डॉ. ओमप्रकाश शेटे यांनी आज केले.
एकत्रित आयुष्मान भारत – प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेच्या आढावा बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते.
जिल्हा नियोजन समिती सभागृह येथे आयोजित या बैठकीस आमदार सुधीर गाडगीळ, आमदार गोपीचंद पडळकर, आमदार सुहास बाबर, जिल्हाधिकारी अशोक काकडे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे, अधिष्ठाता डॉ. प्रकाश गुरव, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. विक्रमसिंह कदम, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विजयकुमार वाघ व्यासपीठावर उपस्थित होते.
डॉ. ओमप्रकाश शेटे म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार एकत्रित आयुष्मान भारत योजनेतील सूचिबद्ध रूग्णालयांच्या संख्येत वाढ झाली असून, राज्यातील 4 हजार 180 रूग्णालयांना मान्यता दिली असून त्यापैकी 2 हजार 472 सूचिबद्ध रूग्णालयांतून उपचार दिले जाणार आहेत. तसेच 34 विशेष स्पेशालिटी उपचार पध्दती सुरू केलेली आहे. याबरोबरच कार्पोस निधीमधून 10 प्रकारच्या अवयव प्रत्यारोपणाचाही समावेश केला आहे. रूग्णालयांचे वर्गीकरणही आता बंद करण्यात आले आहे. रूग्णालयांना सुधारीत पॅकेजमध्ये पॅकेजव्यतिरीक्त NABH मानांकित रुग्णालयास 15 टक्के प्रोत्साहनपर भत्ता देण्यात येणार आहे. या योजनेच्या माध्यमातून समाजातील प्रत्येक घटकाला न्याय देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणार असल्याचे ते म्हणाले. लवकरच एक चॅटबोटच्या आधारावर स्वतंत्र ॲप विटोल फ्री क्रमांक 18002332200 या क्रमांकावर संपर्क साधूनही आवश्यक माहिती मिळणार आहे.
यावेळी जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या संकल्पनेतून सांगली जिल्हा घरेलु कामगार महिला यांच्या आरोग्य शिबिराचा वेगळा उपक्रम राबवल्याबद्दल अभिनंदन करून डॉ. ओमप्रकाश शेटे म्हणाले, हा उपक्रम पथदर्शी असून तो राज्यस्तरावर राबविण्यासाठी प्रयत्न करू.