
आदिवासी व कामगारांच्या प्रश्नांवर सकारात्मक तोडगा !
मुंबई प्रतिनिधी-अकोले तालुक्यातील राजूर येथून आदिवासी शेतकरी, अर्धवेळ परिचारिका, पोषण आहार तयार करणारे मदतनीस व कामगार यांच्या विविध मागण्यांसाठी अहिल्यानगर जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला आहे. लाॅग मार्च संगमनेर पर्यत आला असून, त्यांच्या प्रश्नांची दखल घेत मंत्रालयात सविस्तर चर्चा करण्यात आली.
यावेळी संबंधित मागण्यांवर सखोल चर्चा होऊन बहुतांश मागण्या मान्य करण्याबाबत शिष्टमंडळाला आश्वासन देण्यात आले. तसेच, उर्वरित मागण्यांबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमवेत चर्चा करून लवकरच निर्णय घेण्यात येईल, असेही आश्वासित करण्यात आले. तसेच, शासन स्तरावर सकारात्मक भूमिका घेत आदिवासी व कामगार बांधवांच्या न्याय्य मागण्यांवर मार्ग काढण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा ठाम विश्वास जलसंपदामंत्री तथा पालकमंत्री डॉ राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केला.
या बैठकीस आदिवासी विकास मंत्री अशोक उईके, शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे व आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांच्यासह आंदोलनाचे नेते आमदार विनोद निकोले, डॉ. अजित नवले, नामदेव भांगरे, नंदू डहाळे, हेमलताताई शेळके, कल्पनाताई धनवटे, रंजनाताई पर्हाड, वैशालीताई सुरसे यांच्यासह प्रतिनिधी उपस्थित होते.
000000



