vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

राज्यात मधक्रांती घडवून आणण्यासाठी खादी ग्रामोद्योग मंडळ प्रयत्नशील -खादी ग्रामोद्योग मंडळ सभापती रवींद्र साठे

राज्यात मधक्रांती घडवून आणण्यासाठी खादी ग्रामोद्योग मंडळ प्रयत्नशील -खादी ग्रामोद्योग मंडळ सभापती रवींद्र साठे

 

अहिल्यानगर, प्रतिनिधी- मधमाश्या या निसर्गचक्रातील अत्यंत महत्त्वाचा घटक असून पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी तसेच शेती उत्पादनवाढीसाठी मधमाशी संगोपनाची मोठी गरज आहे. संपूर्ण महाराष्ट्रात ‘मध क्रांती’ घडवून आणण्यासाठी खादी व ग्रामोद्योग मंडळ प्रयत्नशील आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाचे सभापती रवींद्र साठे यांनी केले.

अकोले तालुक्यातील उडदावणे येथे महिला दिनानिमित्ताने आयोजित मधुमक्षिका पेटी वितरण कार्यक्रमात ते बोलत होते.

  कार्यक्रमास खादी ग्रामोद्योग मंडळाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी गीतांजली बाविस्कर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी नित्यानंद पाटील, वन्यजीव विभागाचे सहाय्यक वनसंरक्षक अधिकारी अनिल पवार, वनपरिक्षेत्राधिकारी रुपेश गावित, जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी बाळासाहेब मुंडे, वनपाल शंकर लांडे, रघुनाथ कुंवर, अनिल साळवे, हेरंब कुलकर्णी, कुंदन कोरडे, सतीश भांगरे, मारुती मेंगाळ, उडदावणे गावच्या सरपंच कीर्ती गि-हे, बच्चू गांगड यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

  सभापती रवींद्र साठे म्हणाले, मधमाशी टिकली तरच निसर्गचक्र टिकेल. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी मधमाशांचे संगोपन अत्यंत आवश्यक आहे. मध उत्पादनातून ग्रामीण भागात रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होऊ शकतात. बँकांच्या सहकार्याने मध व्यवसायाला प्रोत्साहन देण्यात येत असून गावकऱ्यांनी एकजुटीने प्रयत्न केल्यास उडदावणे हे गाव महाराष्ट्रात ‘मधाचे गाव’ म्हणून ओळखले जाईल.

ते पुढे म्हणाले, गावातील महिला व युवकांनी पुढाकार घेतल्यास मध व्यवसायातून आर्थिक उत्पन्नाचे नवे स्रोत निर्माण होतील. या उपक्रमामुळे गावाची ओळख राज्याच्या नकाशावर वेगळ्या पद्धतीने निर्माण होईल, असेही ते म्हणाले.

 खादी ग्रामोद्योग मंडळाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी नित्यानंद पाटील म्हणाले, उडदावणे गावाला पर्यटनाच्या दृष्टीनेही मोठी संधी आहे. भंडारदरा परिसरात येणाऱ्या पर्यटकांना ‘निसर्गाचे सोनं’ म्हणून ओळखला जाणारा मध आकर्षित करू शकतो. गावातून तयार होणारा मध खादी ग्रामोद्योग मंडळाकडून खरेदी करून गावाच्या आर्थिक विकासाला चालना देण्यात येईल.

अकोले तालुक्यातील भंडारदरा धरणाच्या पाणलोटात उडदावणे हे गाव निसर्ग संपत्तीने वाढलेले आहे . या गावाची नैसर्गिक रचना पाहून खादी ग्रामोद्योग महामंडळाने सदर गावाची माधाचे गाव म्हणून अग्रेसर करण्यासाठी निवड केली असून गावातील नागरिकांना मधमाशांच्या संगोपनातून मध संकलन करण्याचे विशेष असे प्रशिक्षण देण्यात आले असल्याची माहितीही यावेळी देण्यात आली.

या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी बाळासाहेब मुंडे व त्यांच्या कर्मचारीवृंदासह सरपंच कीर्ती गि-हे, ग्रामविकास अधिकारी तेजल जाधव आणि ग्रामस्थांनी विशेष प्रयत्न केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक रघुनाथ नारायणकर यांनी केले.

0000

संबंधित पोस्ट

जिल्ह्यात घर, दुकान, फ्लॅट भाड्याने दिल्यास माहिती पोलीसांना देणे बंधनकार

निर्लेखित साहित्याच्या विक्रीसाठी इच्छुक जी.एस.टी.नोंदणीधारक खरेदीदारांनी निविदा सादर कराव्यात.

तामिळनाडूत करूर इथे राजकीय मेळाव्यात झालेल्या दुर्दैवी घटनेतील बाधितांसाठी पीएमएनआरएफ मधून पंतप्रधानांनी केले सानुग्रह अनुदान जाहीर

vishwatmaklokswamivarta

इयत्ता दहावी आणि बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन .वीरशैव लिंगायत समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा जगदविवेक प्रतिष्ठानच्यावतीने 25 जून रोजी सत्कार

दुसऱ्या महायुध्दातील माजी सैनिक/ सैनिक विधवा यांना आवाहन…

पालघर जिल्ह्यामध्ये कृषी महाविद्यालय व मत्स्य विद्यालय स्थापन-करण्याबाबत शासन सकारात्मक- कृषिमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे