जन्म – ८ ऑगस्ट १९३२ (मुंबई)स्मृती – १४ मार्च १९९८ (दादर,मुंबई)
विशेष प्रतिनिधी-१९६९ साली भालजी पेंढारकरांच्या ‘तांबडी माती’ चित्रपटाद्वारे दादा कोंडके यांनी चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवले. सोंगाड्या, आंधळा मारतो डोळा, पांडू हवालदार, राम राम गंगाराम, बोट लावीन तिथे गुदगुल्या हे त्यांचे विशेष गाजलेले चित्रपट होत. ‘सोंगाड्या’ ही दादा कोंडके यांची पहिली निर्मिती. यांना विनम्र अभिवादन
अपना बाजार’ दुकानात दरमहा साठ रुपयाने कामावर असतानाच कृष्णा खंडेराव कोंडके उर्फ दादा कोंडके सेवादलाच्या बँड मध्ये काम करू लागले. तेथे कलेचा नाद त्यांना शांत बसू देईना, म्हणून प्रसिद्ध गाण्यांची विडंबने करणे, विचित्र गाणी रचणे, त्यांना चाली लावणे हे फावल्या वेळेतले छंद त्यांनी जोपासले. सेवादलात असतानाच त्यांची गाठ निळू फुले, राम नगरकर यांच्याशी पडली. आणि सेवादलाच्या नाटकांत दादा छोटी मोठी कामे करू लागले. पथ-नाट्यात आपल्या विनोदाच्या टाईमिंगवर हशा उसळवणाऱ्या दादांचे प्रसिद्ध होणे त्यांच्या सेवादलातील साथीदारांना पाहवले नाही. ‘खणखणपुरचा राजा’ मधील गाजणारी भूमिका सोडून, सेवा दलातून फारकत घेत दादा कोंडके यांनी स्वतःचा फड उभारला. दादा कोंडके वसंत सबनिसांच्या ‘विच्छा माझी पुरी करा’ नाटकातून पुन्हा रंगभूमीवर उतरले. दादा कोंडके यांच्या आयुष्यातील हे वळण दादांच्या आणि एकूणच महाराष्ट्राच्या भविष्यावर फार मोठे उपकार करून गेले. दादांनी परत मागे वळून कधी पाहिलेच नाही. ‘विच्छा’चे १५०० हून अधिक प्रयोग झाले आणि दादांसारखे रत्न भालजी पेंढारकरांसारख्या पारख्याच्या नजरेत पडले. विच्छा माझी पुरी करा या वसंत सबनीस लिखित वगनाट्यामुळे दादा कोंडके अभिनेता म्हणून प्रसिद्धीस आले.
१९६९ साली भालजी पेंढारकरांच्या ‘तांबडी माती’ चित्रपटाद्वारे दादा कोंडके यांनी चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवले. सोंगाड्या, आंधळा मारतो डोळा, पांडू हवालदार, राम राम गंगाराम, बोट लावीन तिथे गुदगुल्या हे त्यांचे विशेष गाजलेले चित्रपट होत. ‘सोंगाड्या’ ही दादा कोंडके यांची पहिली निर्मिती. हा चित्रपट खुप गाजला. दादांनी मराठीत एकुण १६ चित्रपटांची निर्मिती केली. विशेष म्हणजे सर्व चित्रपट रौप्यमोहोत्सवी ठरले. हा विक्रमामुळे त्यांचे नाव गिनीज बुकात नोंदले गेले. अभिनया सोबतच त्यांनी प्रामुख्याने मराठी भाषेतील व सोबतच हिंदी व गुजराती भाषांतील चित्रपटांची निर्मितीही केली. प्रख्यात विनोदी अभिनेते एवढीच त्यांची ओळख नव्हती. गीतं, संवाद, लेखनं यशस्वी चित्रपट निर्माता, दिग्दर्शक आणि एक उत्तम माणूस अशी दादा कोंडके यांची ओळख होती. अनेक रजत व सुवर्णमहोत्सवी चित्रपट या गुणी कलवंताने दिले. खरे तर दादा कोंडके यांच्या सारखा सारखा कलाकार पुन्हा झाला नाहीच. मराठी सिनेसृष्टीतील ऐतिहासिक आणि सुवर्णकाळ म्हणजे दादा कोंडके यांची कारकीर्द.
दादांनी प्रेक्षकांना हसवले आणि प्रसंगी अगदी अलगद टचकन रडवले देखील. त्यांच्या काळातील सिनेसृष्टी आणि सध्याच्या काळातील सृष्टी यात प्रचंड तफावत आहे. खूप अत्याधुनिक तंत्र आता उपलब्ध आहे. मराठी चित्रसॄष्टीला सुवर्णकाळ दाखवणारे मराठी शोमॅन दादा कोंडके व त्यांचे अस्सल मराठी मातीशी इमान राखणारे गावरान भाषेतील इरसाल विनोदी चित्रपट हा एक अमूल्य ठेवा आहे. त्यांच्या चित्रपटांइतकीच किंबहुना त्याहूनही सरस असणारी त्यातील गीते आज ५० वर्षानंतर देखील तितकीच श्रवणीय आहेत. दादा कोंडके सारखे कलावंत मात्र नाहीत. आणि सध्याच्या युगात अशा दादा कोंडके यांचे एकटा जीव सदाशिव, सोंगाड्या, रामराम गंगाराम, पांडू हवालदार असे गाजलेले चित्रपट कुठे टी व्ही वर दिसत नाहीत. जुन्या तंत्रात असलेल्या या चित्रपटांचे कोणी पुनरुज्जीवन केले नाही. अनेक जुने चित्रपट, गाणी वारंवार टीव्ही वर दिसतात पण जणू दादा कोंडके यांचे चित्रपट रसिकांना बघायला मिळत नाहीत. दादा कोंडके यांच्या जीवनावर ‘एकटा जीव’ हे पुस्तक लिहिण्यात आले होते. या पुस्तकात दादा कोंडके यांचे चरित्र आहे. त्यांचं व्यक्तिमत्व प्रगल्भ, बहुआयामी होतं. पडद्यावरचं त्यांचं आयुष्य अनेकांनी अनेक वेळा पाहिलं असेल, पण दादा पडद्यामागे कसे होते, याची ओळख लेखिका अनिता पाध्ये यांनी या पुस्तकात करून दिली आहे. प्रत्यक्ष दादांच्याच शब्दांत ती वाचायला मिळते. बालपण, तारुण्य, नातेसंबंध, सिनेमाचे जग, तेथील वातावरण, रसिकांचे मिळालेले प्रेम, सेन्सॉर बोर्ड, द्वयर्थी गीतांच्या गमतीजमती अशा अनेक विषयांवर दादा मोकळेपणानं बोलले आहेत. त्यांचा हजरजबाबीपणा आणि विनोदाची उत्तम जाण त्यातून ठळक होते. दादा जसे सदाहरित होते, तसें हे पुस्तकही. दादा कोंडके यांची काही गाणी – अगं ये जवळ घे ना, मी तर भोळी अडाणी सखू, नको चालूस दुडक्या चाली, काय ग सखू बोला दाजीबा,मळ्याच्या मळ्या मंधी कोण ग उभी.