गडचिरोली, प्रतिनिधी: श्रीरामनवमी (२६ मार्च) व हनुमान जयंती (२ एप्रिल) उत्सवांच्या पार्श्वभूमीवर तसेच नक्षल चळवळीच्या टी.सी.ओ.सी. कालावधीत संभाव्य कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने गडचिरोली जिल्ह्यात १५ दिवस जमावबंदी लागू करण्यात आली आहे.
जिल्हादंडाधिकारी अविश्यांत पंडा यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम, १९५१ च्या कलम ३७ (१) व (३) अन्वये हा आदेश जारी केला असून, तो दि. २२ मार्च २०२६ रोजी मध्यरात्री ००.०१ वाजल्यापासून ते ५ एप्रिल २०२६ रोजी रात्री २४.०० वाजेपर्यंत संपूर्ण जिल्ह्यात लागू राहणार आहे.
या आदेशानुसार शस्त्रे, स्फोटक पदार्थ, दगडफेक साहित्य बाळगण्यास मनाई करण्यात आली असून, परवानगीशिवाय मिरवणुका, सभा, आंदोलन यांवरही बंदी घालण्यात आली आहे. तसेच सार्वजनिक ठिकाणी पाच किंवा अधिक व्यक्तींना एकत्र येण्यास मनाई करण्यात आली आहे.