डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ६ महसुली विभागात सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन अकोला येथे भीम गीतांच्या माध्यमातून मानवंदना; सांस्कृतिक कार्य विभागाचा प्रेरणादायी उपक्रम
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ६ महसुली विभागात सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन अकोला येथे भीम गीतांच्या माध्यमातून मानवंदना; सांस्कृतिक कार्य विभागाचा प्रेरणादायी उपक्रम
अकोला, प्रतिनिधी-महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागातर्फे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त ‘भीमगर्जना’ या विशेष सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन महाराष्ट्रातील सहा महसूल विभागात करण्यात आले आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून भीम गीतांची संगीतमय मानवंदना अर्पण करून डॉ. आंबेडकरांच्या विचारांना आणि कार्याला अभिवादन करण्यात येणार आहे.
हा कार्यक्रम केवळ सांस्कृतिक सादरीकरणापुरता मर्यादित नसून, समाजात समता, बंधुता आणि न्याय या मूल्यांची जाणीव करून देणारा प्रेरणादायी उपक्रम आहे. डॉ. आंबेडकरांच्या जीवनकार्याचा आणि त्यांच्या सामाजिक परिवर्तनातील योगदानाचा आढावा संगीत आणि सादरीकरणाच्या माध्यमातून प्रभावीपणे मांडण्यात येणार आहे.अकोला येथे हा कार्यक्रम सोमवारी, दि. १३ एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी ६:३० वाजता प्रमिलाताई ओक सभागृह, अकोला येथे आयोजित करण्यात आला आहे.कार्यक्रमात कुणाल भास्कर वाकोडे, सौ. किरण कुणाल वाकोडे तसेच सचिन जाधव (गिटार), जानराव बहाले (बासरी व क्लॅरिनेट), जयकुमार गुरु (कीबोर्ड), विशाल इंगळे (ढोलक), कार्तिक चंडाले (ढोल), नितीन गुरु (ऑक्टोपॅड), अनिकेत अंबुसकर (तबला) यांचा सहभाग असणार आहे. तसेच माणिकराव वानखडे हे सूत्रसंचालन करणार असून, आकाश वानखडे व प्रतीक आंबेकर हे कोरस म्हणून सहभागी होणार आहेत.हा कार्यक्रम महाराष्ट्राचे सांस्कृतिक कार्य व माहिती तंत्रज्ञान मंत्री ॲड. आशिष शेलार यांच्या संकल्पनेतून साकार होत असून, सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली या उपक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत आहे. सांस्कृतिक कार्य संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या वतीने या कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले असून, राज्याच्या सांस्कृतिक परंपरेचा गौरव करण्याचा प्रयत्न यामधून करण्यात येत आहे.
सदर कार्यक्रम सर्वांसाठी विनामूल्य आयोजित करण्यात आला असून, डॉ. आंबेडकरांच्या विचारांचा व्यापक प्रसार करून समाजात समता, बंधुता आणि सामाजिक न्यायाची जाणीव अधिक दृढ करण्याचा या उपक्रमामागील प्रमुख उद्देश आहे. विविध घटकांतील नागरिक, विशेषतः विद्यार्थी व युवकांनी या कार्यक्रमात सहभागी होऊन प्रेरणा घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
या सांस्कृतिक उपक्रमाला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोठ्या संख्येने उपस्थित राहावे आणि कार्यक्रम यशस्वी करावा, असे आवाहन बिभीषण चवरे, संचालक, सांस्कृतिक कार्य संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या वतीने करण्यात आले आहे.