वैचारिक दिवाळखोरीकडे चाललेली पिढी समाजासाठी मोठे संकट : मंगल खिवंसरा
छत्रपती संभाजीनगर : प्रतिनिधी“वैचारिक दिवाळखोरीकडे चाललेली आजची पिढी समाजासाठी मोठे संकट ठरत असून चिकित्सा, संवाद आणि सामाजिक जाणिवा जपणारी विचार परंपरा टिकवणे ही काळाची गरज आहे,” असे प्रतिपादन ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या मंगल खिवंसरा यांनी केले. त्या स्थानिक जिजाऊ मंदिर, म्हाडा कॉलनी, बाबा पेट्रोल पंपाजवळ, छत्रपती संभाजीनगर येथे १२ वे रमाई महिला चळवळीचे साहित्य संमेलन, पुणे–२०२६ च्या अध्यक्षपदी प्रा. प्रतिमा परदेशी यांची निवड झाल्याबद्दल आयोजित कार्यक्रमातून बोलत होत्या. यावेळी पिछडा ओबीसी संघटनेचे सुदाम चिंचाणे तसेच आंबेडकरी साहित्यिक भीमराव सरवदे आदी उपस्थित होते.
यावेळी प्रा. प्रतिमा परदेशी यांचा शाल, पुष्पगुच्छ व स्मृतिचिन्ह देऊन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. सत्काराला उत्तर देताना प्रा. परदेशी यांनी परिवर्तनवादी साहित्याची परंपरा जपण्याचा निर्धार व्यक्त केला. “महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, सावित्रीबाई फुले यांच्या विचारांवर आधारित साहित्य चळवळ समाजाला दिशा देणारी आहे, असे त्या म्हणाल्या. यावेळी सुदाम चिंचाणे यांनी मागासवर्गीय समाजातील प्रश्नांवर भाष्य केले, तर भीमराव सरवदे यांनी आंबेडकरी साहित्य चळवळीचा वारसा पुढे नेण्याचे आवाहन केले.
प्रास्ताविक प्रा.डॉ. रेखा मेश्राम यांनी केले, सूत्रसंचालन अॅड. वैशाली डोळस, आभार प्रा. भारत शिरसाट यांनी केले. महिला वर्कशॉप मध्ये …. महिलांनी सहभाग नोंदविला. तसेच मराठा सेवा संघ, विद्रोही सांस्कृतिक चळवळ व इतर उपस्थितांकडून प्रतिमा परदेशी यांचा सत्कार करण्यात आला.
चौकट,चिकित्सा नाकारणाऱ्या संस्कृतीविरोधात रमाई साहित्य संमेलनाचा एल्गार ; प्रा. प्रतिमा परदेशी“साहित्य हे केवळ मनोरंजनाचे माध्यम नसून सामाजिक परिवर्तनाचे प्रभावी साधन आहे. स्त्री, बहुजन, श्रमिक आणि वंचित समाजाच्या वेदना मांडणारे साहित्यच समाजाला नवी दिशा देऊ शकते. परिवर्तनवादी विचारांना रोखण्याचा प्रयत्न होत असतानाच चिकित्सा नाकारणाऱ्या संस्कृतीविरोधात रमाई साहित्य संमेलनाने एल्गार पुकारला आहे.