
नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात स्वच्छ व पिण्यायोग्य पाणीपुरवठा…
नवी मुंबई प्रतिनिधी नवी मुंबई महानगरपालिकेच्या मोरबे मुख्य जलवाहिनीवरील सुधारणा करण्याच्या कामासाठी महानगरपालिका क्षेत्रामध्ये दि. 13 मे 2026 व दि. 14 मे 2026 असे दोन दिवस शटडाऊन घेण्यात आलेला होता. हे काम पूर्ण झाल्यानंतर दि. 15 मे 2026 पासून पाणी पुरवठा सुरळीत झालेला आहे. तथापि शटडाऊनच्या काळात पाईपलाईन बंद असल्याने तो सुरू झाल्यानंतर काही भागात एक दिवस गढुळ पाणी पुरवठा झाला होता. मात्र त्यानंतर आता स्वच्छ पाणी पुरवठा सुरू झालेला आहे.
तथापि काही प्रसारमाध्यमांमध्ये याबाबत आलेल्या बातम्यांच्या अनुषंगाने जुईनगर येथील अपोलो सोसायटी व त्या लगतच्या सोसायट्यांमध्ये विभागातील अभियंतांनी तेथील रहिवाशांसोबत पाणी नमुने तपासून घेतले आहेत व ते पिण्यायोग्य असल्याचे आढळले आहे. या सोसायटीमधील रहिवाश्यांनीही शटडाऊननंतर एक दिवस गढुळ पाणी आले होते व त्यानंतर स्वच्छ पाणी पुरवठा होत असल्याचे सांगितले तसेच सद्यस्थितीत गढुळ पाण्याची तक्रार नसल्याचे सांगितले. अशाचप्रकारे नेरूळ, सानपाडा व इतर क्षेत्रातही पाणी नमुने तपासणी करण्यात आली व पाणी नमुने स्वच्छ व पिण्यायोग्य असल्याचे आढळून आले.
त्यास अनुसरून नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रामधील नागरिकांना सूचित करण्यात येते की, सद्यस्थितीत नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रामध्ये स्वच्छ व पिण्यायोग्य पाणी पुरवठा होत आहे याची नोंद घेण्यात यावी व याबाबत काही तक्रार असल्यास संबंधित विभाग कार्यालयात अथवा 1800222309 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात येत आहे.



