
नाशिक येथे टीईटी परीक्षा केंद्रांवर प्रवेश नाकारल्याने विद्यार्थी संतप्त…
नाशिक प्रतिनिधी : नाशिक मधील परीक्षा केंद्रांवर रविवारी सकाळी दहा वाजता टीईटीच्या परीक्षेला सुरुवात झाली. दहा वाजून दहा मिनिटांपर्यंत प्रवेशाची वेळ दिलेली असताना काही परीक्षार्थी दोन-तीन मिनिटांनी उशिरा परीक्षा केंद्रावर पोहोचले. त्यामुळे त्यांना परीक्षा केंद्रावर प्रवेश नाकारण्यात आला. त्यामुळे लांबून आलेल्या परीक्षार्थी विद्यार्थ्यांना अश्रू अनावर झाले, गेट बंद असल्याने परीक्षार्थी पोलिसांना विनवणी करत होते.
काठे गल्ली परिसरातील रवींद्र विद्यालय येथील परीक्षा केंद्रावर दहा ते बारा परीक्षार्थी प्रवेश मिळण्याच्या प्रतीक्षेत बराच वेळ प्रवेशद्वारावर थांबून होते. तसेच शहरातील अन्य परीक्षा केंद्रांवर देखील परीक्षार्थींना वेळेच्या मुद्द्यावर अटकाव करण्यात आल्याचे समजते. पंचवटी परिसरातील उन्नती विद्यालयात अशाच प्रकारे विद्यार्थ्यांना वेळेच्या मुद्द्यावरून अडविण्यात आल्याची माहिती मिळते आहे. दरम्यान एमपीएससी सारख्या परीक्षांना पाच मिनिटांची सवलत दिली जात असताना, टीईटीला परीक्षेला अडवणूक का असा प्रश्न विचारण्यात आला. परीक्षार्थी, त्यांचे नातेवाईक बराच वेळ परीक्षा केंद्राबाहेर प्रवेशाच्या प्रतीक्षेत उभे होते.



