
सातारा शहरातील रामदास स्वामींचे छत्रपती शिवाजी महाराज समवेत चे शिल्प हटविण्याची मागणी….
सातारा प्रतिनिधी: शहरातील राजवाडा बस स्थानकामधील छत्रपती शिवाजी महाराजांसमवेत असणारे रामदास स्वामींचे वादग्रस्त शिल्प कुठलाही ऐतिहासिक पुरावा नसताना उभारले. प्रशासनाने एक महिन्याच्या मुदतीत शिल्प न काढल्यास आम्ही हटवू, असा इशारा ज्येष्ठ इतिहास संशोधक श्रीमंत कोकाटे यांनी पत्रकार परिषदेत दिला.
दरम्यान, सहा महिन्यांपूर्वी पूरोगामी संघटनांनी जिल्हा प्रशासनाला निवेदने देऊनही अनधिकृत शिल्पांची उभारणी करत उद्घाटनही झाले. याचा अर्थ पोलिस प्रशासनाची या प्रकरणाला मूकसंमती आहे काय? असा प्रश्नही कोकाटे यांनी उपस्थित केला. येथील विश्रामगृहात झालेल्या पत्रकार परिषदेत कोकाटे बोलत होते. यावेळी पार्थ पोळके, अमर गायकवाड, अरबाझ शेख उपस्थित होते. श्री. कोकाटे म्हणाले, ‘‘राजवाडा बस स्थानकात शिल्प उभारून मिलिंद एकबोटे व विजय काटवटे यांनी कुठल्या आधारे उद्घाटन केले.
या देशात भाजप व राष्ट्रीय स्वयंसेवक संघ सातत्याने खोटा इतिहास बहुजनांच्या माथी मारण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे जातीत संघर्ष लावणाऱ्यांवर कडक करवाई होण्याची गरज आहे. सहा महिन्यांपूर्वी शिल्प उभारण्याचा विषय पुढे आल्यानंतर आम्ही जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक, बांधकाम भवन व एसटी महामंडळातील अधिकाऱ्यांना निवेदनही दिले होते. मात्र, महाराष्ट्राच्या अस्मितेच्या प्रश्नावर या विभागाने दुर्लक्ष केले.’’ पोळके म्हणाले,‘‘भाजप व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा जातीय दंगली घडविण्याचा हेतू आहे. शिवरायांचा खरा इतिहास पुसण्याचा प्रकार भाजप करत आहे. यासारखे प्रकार राज्यात वारंवार घडत असल्याने जनतेने ठोस भूमिका घेण्याची गरज आहे.’’
निमंत्रणपत्रिकेकडे दुर्लक्षछत्रपती शिवाजी महाराजांचे रामदास स्वामी गुरू असल्याचा कुठलाही ऐतिहासिक पुरावा नसतानाही शिल्प उभारणे हे भावना दुखविण्याचा प्रकार आहे. राजवाडा बस स्थानकात हे अनधिकृत शिल्प उभारून त्याच्या उद्घाटनाची निमंत्रणपत्रिका चार दिवस सोशल मीडियात फिरूनही या प्रकाराकडे पोलिस प्रशासनाने दुर्लक्ष केले. त्यामुळे, पोलिसांनी बघ्याची भूमिका का घेतली? असा प्रश्न कोकाटे यांनी उपस्थित केला



