
मुंबईत राहण्याचं स्वप्न पूर्ण होणार: म्हाडाच्या ४ हजार ८३ घरांसाठी आजपासून अर्ज विक्री सुरू होणार….
मुंबई प्रतिनिधी
म्हाडाच्या मुंबई गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळातर्फ ४,०८३ घरांच्या सोडतीसाठी आज, २२ मेपासून अर्ज नोंदणी, ऑनलाइन अर्ज स्वीकृतीला प्रारंभ होणार आहे. ही सर्व प्रक्रिया अत्याधुनिक सॉफ्टवेअरच्या साहाय्याने कार्यान्वित होणार असून घरांची सोडत १८ जुलै रोजी सकाळी ११ वाजता वांद्रेतील रंगशारदा सभागृहात पार पडणार आहे.
यंदाच्या संगणकीकृत सोडतीसाठी वापरणाऱ्या येणाऱ्या सॉफ्टवेअरमध्ये म्हाडाने नवीन बदल केले आहेत. ‘आयएचएलएमएस’ एकात्मिक गृहनिर्माण सोडत व्यवस्थापन प्रणाली संगणकीय सोडत प्रणालीचे २.० व्हर्जन आहे. म्हाडाने घरांची सोडत मानवी हस्तक्षेपाशिवाय १०० टक्के पूर्ण करण्यासाठी बदल केले आहेत. सोडतीत सहभागी होण्यासाठी नोंदणी, कागदपत्रे सादर करणे, पात्रता निश्चिती, ऑनलाइन सोडत वितरण, घरांच्या रकमेचा भरणा अशा सर्व प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने होणार आहेत. त्यासह अँड्रॉइड मोबाइलवर प्ले स्टोअर आणि अॅपल मोबाइलवर अॅप स्टोअरमध्ये मोबाइल अॅप्लिकेशन (म्हाडा हाउसिंग लॉटरी सिस्टीम) उपलब्ध केली आहे.
सोडत प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी अर्जदारांनी ऑनलाइन नोंदणी करणे आवश्यक आहे. नोंदणी केलेल्या पात्र अर्जदारांना अर्ज सादर करण्यासाठी २६ जूनपर्यंत सायंकाळी ६ वाजेपर्यंत मुदत देण्यात आली आहे. अर्जासोबत उत्पन्न गटानुसार अनामत रक्कम क्रेडिट, डेबिट कार्ड, इंटरनेट बँकिंगच्या सहाय्याने २६ जून रात्री ११.५९ पर्यंत मुदत आहे. त्यासह अनामन रक्कमेसाठी आरटीजीएस, एनइएफटीमार्फत करण्यासाठी २८ जून रोजी बँकेच्या वेळेत भरता येणार आहे. सोडतीसाठी प्राप्त अर्जांची प्रारूप यादी ४ जुलै रोजी दुपारी तीन वाजता म्हाडाच्या https://housing.mhada.gov.in व https://www.mhada.gov.in या अधिकृत संकेतस्थळांवर प्रसिद्ध केली जाईल. ऑनलाइन दावे व हरकती ७ जुलै दुपारी तीन वाजेपर्यंत दाखल करता येणार आहेत. सोडतीसाठी स्वीकृत अर्जांची अंतिम यादी १२ जुलै रोजी दुपारी ३ वाजता म्हाडाच्या अधिकृत संकेतस्थळांवर प्रसिद्ध केली जाणार आहे.अर्जदारांनी मार्गदर्शनासाठी ०२२-६९४६८१०० या हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन मुंबई मंडळातर्फे करण्यात आले आहे. म्हाडाच्या सोडतीतील घरांविषयी https://housing.mhada.gov.in https://www.mhada.gov.in यावर माहिती प्रसिद्ध केली आहे. इच्छुक अर्जदारांनी संकेतस्थळांचा वापर करावा, असे आवाहन मिलिंद बोरीकर यांनी केले आहे.



