
सुविचार गौरव पुरस्कार वितरण सोहळा संपन्न,सामाजिक क्षेत्रात सुविचार मंचाचे कार्य उल्लेखनीय : उपमुख्यमंत्री अजित पवार
राज्य प्रतिनिधी
समाजातील अनेक चांगल्या व्यक्ती, संघटना व संस्था गावपातळीपासून ते आंतरराष्ट्रीय पातळीपर्यंत आपले कार्य करीत असतात. त्यांना शोधून सार्वजनिकदृष्ट्या समाजासमोर आणून त्यांचा गौरव करणे, त्यांचा आदर्श इतरांसमोर ठेवून त्यांनाही चांगल्या कामासाठी प्रेरित करण्याचे सुविचार मंचाचे कार्य उल्लेखनीय आहे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.
महाकवी कालिदास कलामंदीर येथे आयोजित सुविचार मंच गौरव पुरस्कार वितरण सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ, विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, आमदार दिलीप बनकर,आमदार दिलीप बोरसे, पद्मश्री सुरेश वाडकर, ॲड.नितिन ठाकरे, साहित्यिक दत्ता पाटील, डॉ शेफाली भुजबळ, , कलावंत गौरव चोपडा, अक्षया देवधर, हार्दिक जोशी, सुविचार मंचचे ॲड.रवींद्र पगार आणि आकाश पगार यांच्यासह इतर पुरस्कार्थी व विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, समाजात चांगल्या विचारांचा प्रसार झाला पाहिजे कारण त्यातूनच सुसंस्कृत समाजाची निर्मिती होत असते. यादृष्टीने अनेक संस्था काम करतात याचाच एक भाग म्हणून सुविचार मंचाचे कार्य अधोरेखित करण्यासारखे आहे. कर्तृत्ववान व्यक्तीचा गौरव करण्यासोबतच नैसर्गिक आपत्तीतही पिडित नागरिकांना निस्वार्थ मदत करण्याचे मोलाचे कार्य सुविचार मंचच्या माध्यमातून होत आहे. तरूण पिढीनेही याचा आदर्श घेवून समाजाप्रती आपले योगदान दिले पाहिजे. नेहमी सकारात्मक विचार करून पुढे गेले पाहिजे. अनेक अनाकलनीय परिस्थितीत संकटे येऊन माणूस जेव्हा हतबल होतो.त्यावेळी त्याच्या पाठिशी मानसिक व नैतिक आधार उभा करून त्याला धीर देणे व पुन्हा उभारी घेण्यासाठी मदतीचा हात देणे हे सुद्धा मोठे कार्य ठरू शकते. अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सुविचार मंचाद्वारे राबविण्यात येणाऱ्या विविध कार्याचा गौरव केला. तसेच पुरस्कारार्थींचे यावेळी कौतुक केले



