
राजकीय द्वेषातून दाख्ाल खोट्या गुन्ह्याची चौकशी करा,ग्रामस्थांचे पोलीस अधीक्षकांना साकडे : ग्रामपंचायत निवडणुकीत आ. नारायण कुचे यांच्या विरोधात पॅनल टाकल्याने सूड उगवल्याचा आरोप …
जालना (प्रतिनिधी) ः बदनापूरचे आ. नारायण कुचे यांच्या पॅनल विरूध्द ग्रामपंचायत निवडणुकीत उभा राहिल्याचा राग मनात धरून भाजपाचे कार्यकर्ते कृष्णा नरोडे यांना हाताशी धरून द्वेश भावनेने वसंत हिवाळे, दिपक डोंगरे, प्रविण धांडगे, सचिन नरोडे यांच्या विरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ते गुन्हे तात्काळ मागे घ्यावे आणि त्या प्रकरणाची चौकशी करून संबंधित लोकांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी बळीराम हिवाळे, मारोती नरोडे आणि गावातील ५० ग्रामस्थांनी पोलीस अधीक्षक यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, आ. नारायण कुचे आणि त्यांचा कार्यकर्ता कृष्णा नरोडे यांनी मुलगी निकिता नरोडे हिला हाताशी धरुन पोलीसांशी संगनमत करत दि. १४ मार्च रोजी चंदनझिरा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद केला. वास्तविक अशी कोणतीच घटना घडलेली नसतांना आणि वसंत हिवाळे हे आपल्या किराना दुकानामध्ये बसलेले हाते. त्याचे सीसीटीव्ही फुटेज देखील उपलब्ध आहे. वसंत हिवाळे यांचा या गुन्हाशी काहीही संबंध नसतांना देखील राजकीय द्वेषभावनेतून खोटा गुन्हा दाखल करण्यात आला. दिपक डोंगरे हे देखील घटनेच्या दिवशी आणि वेळी बाहेरगावी होते. त्याबाबतचे अंबड येथील सिव्हील हॉस्पीटल व जालना येथील आय.सी.आय.सी.आय बँक, मामाचौक, जालना येथील सी.सी.टी.व्ही. फुटेज मागविण्यात येऊन तपासण्यात यावेत. त्यामुळे त्यांचा या गुन्ह्याशी काहीही संबंध नसताना देखील राजकीय व्देष्ाभावनेतून खोटा गुन्हा दाखल करण्यात आला. तसेच या गुन्ह्यातील इतर दोन व्यक्ती नामे प्रविण धांडगे, सचिन नरोडे हे घटनास्थळावरुन जात असतांना सदर ठिकाणी कोणतीही घटना घडलेली नव्हती. परंतु राजकीय व्देश भावनेतून आ. नारायण कुचे व भाजपा कार्यकर्ता कृष्णा नरोडे यांनी कट रचुन गुन्ह्यात नमुद व्यक्तींना फसविण्याच्या गैरउद्देशाने हे व्यक्ती भारतीय जनता पार्टीच्या पक्षाला मदत करीत नसल्यामुळे कृष्णा नरोडे यांनी मुलीचा गैरवापर करून व पोलीस स्टेशन चंदनझिरा येथील पोलीस निरिक्षक सरदारसिंग राजपूत याला हाताशी धरून आर्थिक देवाण – घेवाण करून सदरचा खोटा गुन्हा नोंद करण्यात आला.या घटनेच्यावेळी घटनास्थळी उपस्थित असलेले मारोती नरोडे यांच्याकडे चौकशी केली असता अशी कोणतीही घटना घडलेली नाही असे त्यांनी कबुल केले आहे.
तसेच गुन्ह्यात नमुद व्यक्तींना फसविण्यासाठी आ. नारायण कुचे यांचा कार्यकर्ता कृष्णा नरोडे याने खोटे व बनावट नावे सदरच्या घटनेमध्ये नमुद केलेले आहे. आ. नारायण कुचे यांचा कार्यकर्ता कृष्णा नरोडे यानी सरदारसिंग राजपूत यांना हाताशी धरुन वसंत हिवाळे, बळीराम हिवाळे यांच्या विरुध्द खोटी एन. सी. दाखल केली होती व मला विनाकारण पोलीस स्टेशनमध्ये बसवून ठेवले, मला आरेरावीची भाषा केली. तसेच बळिराम हिवाळे हे त्यांच्या विरुध्द तक्रार देण्यासाठी गेले असता सदर पोलीसांनी तक्रार न घेता आरेरावीची भाषा करुन त्यांना हाकलून दिले.
आ. नारायण कुचे व त्यांचा कार्यकर्ता कृष्णा नरोडे तसेच यांच्याशी संगनमत करणाऱ्या चंदनझिरा येथील पोलीस निरिक्षक सरदारसिंग राजपूत यांची आपल्या स्तरावरून योग्य ती सखोल चौकशी करुन त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी तसेच घटनास्थळी उपस्थित नसलेल्या वसंत हिवाळे व दिपक डोंगरे यांची नावे या गुन्ह्यातून कमी करण्यात यावी व गावामध्ये राजकीय वाद होऊ नये म्हणुन योग्य ती कार्यवाही करून न्याय देण्यात यावा अशी मागणी या ग्रामस्थांनी केली आहे. निवेदनाच्या प्रति मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस, पोलीस महासंचालक, विशेष पोलीस महानिरीक्षक, छत्रपती संभाजीनगर, विभागीय आयुक्त कार्यालय, छत्रपती संभाजीनगर, केंद्रीयमंत्री रावसाहेब दानवे, पालकमंत्री अतुल सावे, जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी आदींनी पाठविण्यात आल्या आहेत.
————————
चौकट
आ. कुचेकडून मुलाला गुन्ह्यात अडकविण्याचा पयत्न ः हिराबाई डोंगरे
चंदनझिरा पोलीस ठाण्याचे सरदारसिंग राजपूत यांनी आ. नारायण कुचे यांच्याशी संगनमत करुन आर्थिक देवाण घेवाण करत मुलगा दिपक डोंगरे विरुध्द चंदनझिरा पोलीस ठाणे येथे दि. १५ मार्च रोजी खोटा गुन्हा केला आहे. सदर घटनेच्या वेळी मुलगा दुसऱ्या ठिकाणी असल्याबाबतचे सी.सी.टि.व्ही. तपासण्या यावे तसेच लोकेशन ट्रॅक करून मुलाचे नाव सदरच्या खोट्या गुन्ह्यातुन कमी करण्यात यावे. मुलगा दिपक डोंगरे, वय 29 वर्षे हा सामाजिक कार्य व शासकीय गुत्तेदारी करतो. बदनापूर तालुक्याचे आ.नारायण कुचे हा नात्याने माझा भाऊ (हिराबाई यांचा भाऊ) आहे. दिपक डोंगरे याला भाऊ आ. नारायण कुचे हा गेल्या ५-६ वर्षांपासून झालेल्या कौटूंबिक वादाचा राग मनात धरुन कोणत्याही कारणावरुन मागील ५-६ वर्षापासून पोलीस प्रशासनाला हाताशी धरुन व आमदार पदाचा गैरवापर करुन जालना व छ. संभाजी नगर जिल्ह्यातील वेगवेगळ्या पोलीस स्टेशनला खोटे गुन्हे दाखल करून माझ्या मुलास विनाकारण त्रास देत आहे. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी करून सदरील खोटे गुन्हे तात्काळ मागे घेण्यात यावी, अशी मागणी देखील पोलीस अधिक्षकांना दिलेल्या तक्रारीत हिराबाई डोंगरे, लक्ष्मणराव डोंगरे यांनी केली आहे



