
पुरातन श्री विठ्ठल रखुमाई मंदिराचा जीर्णोद्धार कामाला सुरुवात१२५ वर्षाचे प्रभादेवीकरांचे श्रद्धास्थान
मुंबई प्रतिनिधी
: प्रभादेवीतील सव्वाशे वर्षाचे पुरातन श्री विठ्ठल-रखुमाई मंदिर हे गेल्या पाच पिढ्यांच्या असंख्य भक्तांचे श्रद्धास्थान आणि अमूल्य ठेवा असून श्री सद्गुरू भावे महाराज समाजाचे सर्व वारकरी आणि समस्त प्रभादेवीकर एकत्र येऊन त्याचे नूतनीकरण करीत आहेत ही श्रद्धेची आणि आनंदाची गोष्ट आहे असे भावपूर्ण उदगार मंदिराच्या चौथ्या पिढीचे मालक अनिल तथा आप्पा नाईक यांनी काढले.
गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर प्रभादेवीतील पुरातन श्री विठ्ठल-रखुमाई मंदिराचा जीर्णोद्धार कामाचा शुभारंभ आप्पा नाईक यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून शुभारंभ करण्यात आला. आप्पा पुढे असेही म्हणाले की, वारकरी संप्रदायासारखा दुसरा पंथ नाही, आमचे पूर्वज हे विठ्ठल भक्त होते त्यामुळे सन १९०० मध्ये त्यांनी स्वयंभू मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली. वारकरी पंथातील आद्यगुरू संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माउलींनी श्री विठ्ठलाचे वर्णन योग्याची माऊली असे केले आहे, या मंदिरात वै. भावे महाराजानंतर ४ पिढ्या १२५ वर्षे श्रद्धेने नतमस्तक होत आल्या आहेत, त्यामुळेच या मूर्तीकडे पाहिल्यानंतर सर्वांचे भान हरपून जाते.
श्री सद्गुरू भावे महाराज वारकरी समाजाचे अधिष्ठान गुरुवर्य ह.भ.प. रामदादा घाडगे यांच्या हस्ते शाल व श्रीफळ देऊन याप्रसंगी आप्पांचा सत्कार करण्यात आला. रवींद्र मालुसरे, संस्थेचे सेक्रेटरी केशव उतेकर यांनी यावेळी आपले विचार मांडले. हभप कृष्णामास्तर घाडगे, विष्णु सकपाळ, निलेश केसरकर, काशीराम कळंबे, चिकणे बुवा, हेमंत सकपाळ, प्रवीण तोडणकर, मारुती कळंबे, सोपान शेलार, युवराज कळंबे, चिंतामणी घाडगे, विष्णुबुवा केसरकर आदी मान्यवर वारकरी याप्रसंगी उपस्थित होते. गणेश आहिरे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभारप्रदर्शन केले



