शेतकरी व सर्वसामान्यांना निराश करणारा अर्थसंकल्प : जिल्हाप्रमुख भास्करराव अंबेकर
जालना प्रतिनिधी : आज राज्य सरकारच्या वतीने सादर करण्यात आलेला अर्थसंकल्प हा सर्वसामान्य व शेतकर्यांची दिशाभूल व निराश करणारा असल्याची प्रतिक्रिया शिवसेना जिल्हाप्रमुख भास्करराव अंबेकर यांनी दिली. प्रतिक्रियेत पुढे म्हटले आहे की, निवडणुकीपूर्वी महायुतीच्या वतीने राज्यातील जनते समोर मोठ मोठ्या घोषणा केल्या. लाडक्या बहिणींना त्यांचे मानधन एकविसशे रुपये करण्याचा शब्द दिला. तरुण बेरोजगारांसाठी उद्योगधंदे व नोकर्यांची हमी दिली होती. परंतु प्रत्यक्षात आज अर्थसंकल्पामध्ये यावर कोणतीही तरतूद करण्यात आली नाही. तसेच शेतकर्यांना सरसकट कर्जमाफी करण्याची घोषणाही हवेत विरली असल्याचे दिसते. नवीन रोजगार निर्मितीसाठी कोणतेही ठोस कार्यक्रम नाहीत. शेतीमालालाही हमी भाव जाहीर केले नाहीत. अशा प्रकारे हा अर्थसंकल्प शेतकरी, सर्व सामान्य नागरिक व तरुणांची दिशाभूल करणारा असल्याचे मत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे जिल्हाप्रमुख भास्करराव अंबेकर यांनी व्यक्त केले.