अध्यात्मिक वार्ता-साधकावस्थेत सर्वात मोठा दोष असेल तर ‘मला समजतं’ असं वाटणं. मी अज्ञानी आहे, मला काही कळत नाही, असं ज्याला खरं खरं वाटलं तोच या मार्गात पुढं गेला. यासाठी प्रपंच सोडायची जरूर नाही. प्रपंच बाधत नाही; पण आपल्याला गुंतल्याशिवाय प्रपंचच करता येत नाही म्हणून तो बाधतो.
सामान्य जिवाची शक्ती मर्यादित असते. त्यातली प्रपंचात वाटली गेली की कमी होते. मनाने प्रपंच सोडावा; यासाठी पुन्हा पुन्हा सांगणारा, करून दाखवणारा यांची संगत पाहिजे. आपल्याला त्याचं महत्त्व कळत नाही. आपण आपल्याच धुंदीत असतो. ही धुंदी नामात आली पाहिजे. नामाची नशा चढली पाहिजे. श्रीमहाराजांनी जागवलंय ते वाया जाऊ देऊ नका. शेवटी काहीतरी काळ असा यावा की आपण नामाला संपूर्ण वाहून घ्यावं. हा जन्म दिला नामाला असं झालं पाहिजे!
साधकाचा साधन प्रवास हा देहबुद्धी कडून आत्मबुद्धी असा असतो. यात बुध्दी व बोध यांची सांगड घातली की मार्ग अजुन सुगम होतो. आता पर्यंत जपलेली देह म्हणजेच मी अशी अल्प ओळख सोडून “मी आत्मा आहे”. मला गुरूंनी देलेले नाम हीच माझी खरी ओळख आहे. गुरूंनी दिलेला बिजमंत्र म्हणजे साक्षात गुरूच व त्याचे स्मरण हाच गुरूंचा सहवास. गुरूंनी दिलेले साधन म्हणजे आत्मबोध सतत जागृत ठेवणे, आत्मा होऊन राहणे, जगणे व अनुभवणे, हीच गुरुभक्ती होय.
आत्मानुसंधानाच्या साधने शिवाय आत्मज्ञाना चे तत्व पचवायला कठीण आहे. परंतु गुरुभक्ती ने ते सुगम होते. गुरु बोधाचे श्रवण मनन कुठ पर्यंत करावे, जो पर्यंत साधक मूर्तिमंत तोच ते होत नाही तो पर्यंत.
आत्मा च मी, असंग, निरुपाधीक आपणच, हा भाव दृढ होत जातो. जशी जशी साधकाची मनोभूमिका स्थिर होते, तशी तशी आत्मजागृती साधत जाते . ज्याने साधनेची भूमिका स्थिर झाली आहे. साधनाचे उत्कटता ज्याच्या मध्ये निर्माण झाली आहे. त्याचे साधन म्हणजे नामासाठी नाम व ध्यानासाठी ध्यान त्याच्या मनामध्ये जग व विषय पूर्णपणे नाहीसे होऊन जातात व केवळ अखंड आत्मजागृती अनुभवास येते. आत्मा व्यतिरिक्त अन्य मिथ्या उपाधी गळून पडतात व अखंड भक्तीचे सूत्र स्वतः ठाई सापडते.