सांगली, प्रतिनिधी जिल्ह्यातील धरण पाणलोट क्षेत्रातील पाऊस कमी झाल्यामुळे धरणातील पाणीपातळी नियंत्रित ठेवण्यासाठी वाढवलेला विसर्ग दि. 21 ऑगस्ट रोजी कमी करण्यात आल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे.
कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील पाऊस कमी झाल्यामुळे धरणातील पाणीपातळी नियंत्रित ठेवण्यासाठी २१ ऑगस्ट २०२५ रोजी सायंकाळी ६:०० वाजता कोयना धरणाचे सहा वक्र दरवाजे ७ फुटांवरून ४ फूट ६ इंचांपर्यंत खाली आणून ३४,६०० क्युसेक विसर्ग कोयना नदीपात्रात सोडण्यात आला आहे. कोयना धरण पायथा विद्युतगृहाचे दोन्ही युनिट सुरू असून त्याद्वारे २१०० क्युसेक्स विसर्ग सुरू आहे. कोयना नदीमध्ये एकूण ३६,७०० क्युसेक विसर्ग करण्यात आला आहे.
दरम्यान, वारणा धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये अतिवृष्टीची तीव्रता थोड्या प्रमाणात कमी झाल्याने जलाशय परिचलन सूची प्रमाणे धरणाची पाणी पातळी नियंत्रीत ठेवणे करिता वक्र द्वाराद्वारे सुरू असणारा विसर्ग धरणातून दिनांक 21/08/2025 रोजी सायंकाळी 6 वाजता बंद करून वक्र दरवाजे बंद करण्यात आले आहेत व विद्युत गृहातून 1630 क्युसेक विसर्ग कायम ठेऊन वारणा नदीपात्रात सोडण्यात आला आहे.
पाऊस चालू/वाढत राहिल्यास व येवा वाढत गेल्यास परिस्थितीनुसार विसर्गात वाढ करण्याबाबत निर्णय घेण्यात येणार असल्याचे सांगून दोन्ही धरण व्यवस्थापनांकडून नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.