नमो नेत्र संजीवनी अभियानाव्दारे हजारो रूग्णांच्या आयुष्यात प्रकाश- या अभियानात 29 सप्टेंबरअखेर 9 हजार 385 रूग्णांची तपासणी, 1 हजार 5 शस्त्रक्रिया..
सांगली, प्रतिनिधी: प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर 2025 या कालावधीत राबविण्यात येत असलेल्या ‘नमो नेत्र संजीवनी आरोग्य अभियानाला’ उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. सांगली जिल्ह्यातील भटक्या जमातींच्या वस्त्या, दलित वस्त्या, तसेच आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांच्या वस्त्यांमध्ये हे अभियान राबविण्यात येत असून यामध्ये नागरिकांची नेत्ररोगसंदर्भात मोफत तपासणी, शस्त्रक्रिया व चष्म्यांचे वाटप करण्यात येत आहे. या अभियानाचा हजारो नागरिकांना लाभ झाला असून या माध्यमातून त्यांना नवी दृष्टी मिळाली आहे.
नमो नेत्र संजीवनी आरोग्य अभियान अंतर्गत जिल्ह्यातील नागरिकांची नेत्र तपासणी, उपचार व मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात येत आहेत. नागरिकांमध्ये नेत्र आरोग्यविषयक जागरुकता वाढवून त्यांना मोफत नेत्र सेवा उपलब्ध करून देण्यासाठी हे अभियात जिल्ह्यात सगळीकडे राबविण्यात येत आहे. यासाठी अधिष्ठाता डॉ. प्रकाश गुरव व जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. विक्रमसिंह कदम, जिल्हा नेत्र शल्यचिकित्सक व राष्ट्रीय अंधत्व निवारणच्या जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक डॉ. गायत्री वडगावे व त्यांची टीम, नेत्र विभाग प्रमुख डॉ. शरद शेगावकर व त्यांची टीम हे अभियान यशस्वीपणे राबविण्याकरिता सक्रिय सहभाग देत आहेत.
या अभियानात 29 सप्टेंबर 2025 अखेर सांगली जिल्ह्यात एकूण 9 हजार 385 रूग्णांची तपासणी झाली असून एकूण 2 हजार 630 चष्म्यांची नोंदणी झाली आहे. जिल्ह्यात शासकीय, एनजीओ, खासगी दवाखान्यात एकूण 1 हजार 5 शस्त्रक्रिया झालेल्या आहेत. यामध्ये शासकीय रूग्णालयात पद्मभूषण वसंतदादा पाटील शासकीय रूग्णालय सांगली व शासकीय रूग्णालय मिरज येथे एकूण 202 मोतीबिंदू यशस्वी शस्त्रक्रिया परिपूर्ण केल्या आहेत.
हे अभियान मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रूग्णालय मदत कक्ष पद्मभूषण वसंतदादा पाटील शासकीय जिल्हा सामान्य रुग्णालय सांगली, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मिरज व जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा सामान्य रूग्णालय, वैद्यकीय महाविद्यालय, ग्रामीण रूग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्रे तसेच विविध सेवाभावी संस्था, धर्मादाय रूग्णालये आणि महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेच्या अंतर्गत संलग्न रूग्णालये यांनी यात सक्रिय योगदान दिले आहे.
या अभियानाचे वाळवा तालुक्यातील येलूर येथील लाभार्थी संजय कोळी यांनी शस्त्रक्रियेनंतर आता व्यवस्थित दिसू लागल्याने जीवनात नवी प्रकाशरेषा उमटली आहे. याबाबत ते म्हणाले, डोळ्याच्या शस्त्रक्रियेसाठी अत्यंत उत्तम सोय उपलब्ध झाली. जेवण, चहा, नाश्ता आदि सुविधाही अतिशय उत्तम आहेत. अपेक्षेपेक्षाही चांगली सोय झाली आहे. मला कमी दिसत होते, परंतु शस्त्रक्रियेनंतर आता चांगले दिसू लागले असल्याचे ते म्हणाले.
या अभियानामुळे जिल्ह्यातील हजारो रुग्णांच्या जीवनात प्रकाश परत आला असून, शासन व सेवाभावी संस्थांच्या संयुक्त प्रयत्नांतून नेत्र आरोग्य सेवा सर्वसामान्यांपर्यंत पोहोचल्याचे समाधानकारक चित्र दिसत आहे.